संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून केली 'होळी'; सरकारच्या नावाने बोंबाबोंब
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 13:46 IST2023-03-06T13:43:26+5:302023-03-06T13:46:05+5:30
कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी करून केंद्र v राज्य सरकारच्या अनास्थेचा निषेध नोंदवला आहे

संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून केली 'होळी'; सरकारच्या नावाने बोंबाबोंब
योगेंद्र वाघ
येवला (नाशिक) : कांदा दारात मोठी घसरण झाल्याने जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या चिंतेत आहे. सरकारने नाफेडकडून कांदा खरेदीची घोषणा केली असली तरी त्याबाबत शेतकरी समाधानी नाही. परिणामी शेतकऱ्यांचा केंद्र आणि राज्य सरकारांवर रोष आहे. याच पार्श्वभूमीवर कांदा दरांतील सततच्या घसरणीला वैतागून येवला तालुक्यातील मतुलठाण येथील शेतकऱ्याने होळीच्या मुहूर्तावर मोठे पाऊल उचलले आहे.
कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी करून केंद्र v राज्य सरकारच्या अनास्थेचा निषेध नोंदवला आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा दरातील घसरण सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. कांदा दरातील घसरणी पाठोपाठ शेतकऱ्यांनी आंदोलने केलीत. मात्र, तरी देखील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आज कृष्णा डोंगरे यांनी टोकाचे पाऊल उचलत शेतात ठिकठिकाणी सरण रचून कांदा पेटवून देत आपला संताप व्यक्त केला.
केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. शेतकऱ्यांचे जगणे सरकारला मान्य नाही. उत्पादकांनी कष्टाने पिकवलेला कांदा जाळू टाकला आहे. आजचा दिवस काळा दिवस आहे. शेतकरी जगला काय आणि मेला काय सरकारला देणे- घेणे नाही.
- कृष्णा डोंगरे, शेतकरी, मतुलठान