लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील २६ गावांमधील अंगणवाड्यांच्या दुरूस्ती प्रस्ताव देवूनही बालविकास प्रकल्प अधिकारी मंजूरीआदेश देत नसल्याने त्या-त्या गावचे सरपंच आंदोलन करणार आहेत. सरपंचांनी सभापती व गटविकास अधिकारी यांची भेट घेत हा इशारा दिला आहे. तळोदा पंचायत समितींतर्गत २६ गावांनी अंगणवाडी दुरूस्तीचे प्रस्ताव बालविकास प्रकल्प अधिकारी यांना दिले होते. या प्रस्तावांवर कारवाई होवून मंजूरी पत्र देण्याची प्रतिक्षा आहे. दरम्यान संबधित अधिकारी हे मंजूरी आदेश काढत नसल्याने उपसभापती लताबाई अर्जुन वळवी यांनी गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांना तक्रार केली होती. गटविकास अधिकारी खर्डे यांनी तातडीने संबधित अधिकार्याला बोलावून समज दिली होती. परंतू यानंतरही दुरूस्तीचे मंजूरी पत्र न काढण्यात आल्याने उपसभापती लताबाई वळवी यांच्यासह २६ गावांचे सरपंच हे आंदोलन करणार आहेत. तसे पत्र त्यांनी गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांना दिले आहे. या प्रकाराने तळोदा पंचायत समिती अधिकार्यांच्या वर्तणुकीवरुन चर्चा रंगली आहे.
अंगणवाडी दुरूस्ती निधी न दिल्यास २६ गावांचे सरपंच करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 12:30 PM