भाजीपाल्यासोबत डाळही सामान्यांच्या आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST2021-07-28T04:32:24+5:302021-07-28T04:32:24+5:30

नंदुरबार : महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंचे दर आठवड्याला कमी-अधिक होत असल्याचे चित्र असून ...

Pulses along with vegetables are beyond the reach of common people | भाजीपाल्यासोबत डाळही सामान्यांच्या आवाक्याबाहेर

भाजीपाल्यासोबत डाळही सामान्यांच्या आवाक्याबाहेर

नंदुरबार : महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंचे दर आठवड्याला कमी-अधिक होत असल्याचे चित्र असून पेट्रोल - डिझेल, गॅस दरवाढीसोबतच भाजीपाला आणि डाळीचे भावही वाढले आहेत. याचा थेट फटका सामान्यांना बसत आहे.

बाजापेठेत आवक होणाऱ्या तूर, मसूर, उडीद आणि चणाडाळीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली असल्याचे विक्रेते सांगत आहेत. वाढत्या महागाईवर परिणाम म्हणून बहुतांश नागरिक गरजेपुरतेच डाळींची खरेदी करत असल्याचे चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे. पर्यायी स्वस्त डाळींवर अधिक भर देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली असून यातून बाजारपेठेत खपावर मोठा परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. किरकोळ आणि ठाेक विक्रेत्यांच्या मालाची ने-आण करण्यासाठीचा वाहतूक खर्च वाढल्याने ही दरवाढ झाली आहे.

म्हणून डाळ महागली

जिल्ह्यात गेल्या काही काळात कडधान्य पिकांचे उत्पादन हे कमीच होते. कोरोनामुळे या कडधान्याची विक्री रखडल्याने मालाची कमतरता आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर हे मागील दोन महिन्यांच्या तुलनेत मोठ्याप्रमाणावर वाढले असल्याची वस्तुस्थिती आहे. त्याचे परिणाम हे महागाईवर आणि डाळीवर झाल्याचे समोर आले आहे.

डाळींच्या मालवाहतुकीचा खर्च हा वाढला आहे. व्यापाऱ्यांनाही मालाची वाहतूक करण्यासाठी वाढीव खर्च येत आहे.

भाजीपाला स्वस्तच...

दरम्यान, एकीकडे किराणा दरांममध्ये वाढ होत असताना भाजीपाला दर मात्र स्थिर आहेत. काही भाज्यांचे दर हे कमी झाले आहेत. पावसाळा असल्याने आवक अधिक असल्याने दरांमध्ये घसरण झालेली नसली तरी भाज्यांचे दर हे कमीच असल्याचे दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात येणारा भाजीपाला हा स्थानिकच पिकवला जात असल्याने वाहतूक खर्च कमी आहे.

दैनंदिन आहारात भाजीपाला आणि डाळी या गरजेच्या आहेत. यातून त्यांची खरेदी ही नित्याची आहे. दरवाढ झाली असली तरी गरज म्हणून या वस्तू घ्याव्याच लागणार आहेत. जेवढी गरज तेवढीच खरेदी करावी लागेल.

जगन्नाथ पवार, नंदुरबार.

भाजीपाला दर खूप नसले तरी डाळी मात्र महागल्या आहेत. यामुळे नियोजन करून खरेदी आणि त्यांचा वापर करण्याची वेळ, महिला वर्गावर आली आहे.

रेखा माळी, नंदुरबार.

Web Title: Pulses along with vegetables are beyond the reach of common people