गृह अलगीकरण उद्यापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 01:35 PM2021-01-19T13:35:58+5:302021-01-19T13:36:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गृह विलगीकरणात अर्थात होम आयशोलेशनची सुविधा आता बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गृह विलगीकरणात अर्थात होम आयशोलेशनची सुविधा आता बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. कोरोना रुग्ण घरी राहून विलगीकरणात न राहता बाहेर फिरतात. त्यामुळे अशा रुग्णांच्या माध्यमातून परिसरात कोरोनाचा प्रसार होतो. संबधीत रुग्ण कुठलाही नियम पाळत नाहीत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी २० फेब्रुवारीपर्यंत गृह अलगीकरणाची सुविधा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. कोविड बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात यावे. संबधित अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील कोविड रुग्णालयांचा आढावा घेऊन आवश्यक सुविधा असल्याची खात्री करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत.
गृह अलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झालेल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसात कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर आदेश देण्यात आले आहेत. संपर्कातील सर्व व्यक्तींची नोंद घेण्याचे निर्देश कोविड बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची नोंद घेण्याचे निर्देशही डॉ. भारुड यांनी दिले आहेत. कोविड बाधित आढळून आलेल्या गावात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्तिश: भेट द्यावी.
बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची स्वॅब चाचणी करावी आणि कोविड बाधित आढळून आल्यास तात्काळ कोविड रुग्णालयात दाखल करावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वाढत्या रुग्णांमुळे चिंता
जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतच असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दररोज ३० पेक्षा अधीक रुग्ण आढळून येत आहेत. सर्वाधिक कोरोनाचे संक्रमण सद्या शहादा तालुक्यात होत आहे. त्याला कारण कोरोना बाधीत कुठलेही नियम पाळत नाहीत. लग्न समारंभ, अंत्यविधी तसेच सार्वजनीक कार्यक्रमांमध्ये या बाबी प्रकर्षाने जानवत आहेत. गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांबाबत तर अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
लग्न समारंभ, अंत्यविधी तसेच गर्दी होणाऱ्या इतर विधी व सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवावे असे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. भारुड यांनी दिले आहेत. नागरिकांकडून मास्क घालणे आणि शारीरिक अंतराबाबत नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.