राज्यपालांचा दौरा सातपुड्यासाठी फलदायी व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:22 PM2020-02-20T12:22:38+5:302020-02-20T12:22:46+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्याच्या अतीदुर्गम भागात तीन वर्षात दुसऱ्यांदा महाराष्टÑाचे राज्यपाल येत असल्याने सातपुड्याच्या ...
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्याच्या अतीदुर्गम भागात तीन वर्षात दुसऱ्यांदा महाराष्टÑाचे राज्यपाल येत असल्याने सातपुड्याच्या डोंगरदºयात चैतन्याचे वातावरण आहे. खुद्द राज्यपाल दारी येत असल्याने आदिवासींच्या विकासाबाबतच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या असून हा दौरा तरी फलदायी व्हावा अशी अपेक्षा त्यांना लागून आहे.
राज्यातील सर्वात अतीदुर्गम आणि मागास भाग म्हणून जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्याची ओळख आहे. या तालुक्याचा विकासाबाबत आजवर खूप चर्चा झाल्या, घोषणा झाल्या पण विकासाची गती मात्र वेग घेत नसल्याचे चित्र आहे. आजही वीज, रस्ते आणि पाणी नसलेले सर्वाधिक गावे याच तालुक्यात आहेत. रोजगार, शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न तर येथील जनतेच्या पाचवीलाच पुजले आहेत. अशा स्थितीत एखाद्या बड्या नेत्याचा दौरा या भागात लागला की येथील जतनेच्या आशा, आकांक्षांना पालवी येते. असेच काहीसे चित्र राज्यपालांच्या दौºयाबाबत लागून आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे गुरुवार, २० रोजी मोलगी, ता.अक्कलकुवा येथे मुक्कामी येत आहेत. दिवसभरात ते या भागातील विकास कामांची पहाणी, आदिवासींच्या प्रश्नांबाबत चर्चा करणार आहेत. या पूर्वी देखील तीन वर्षांपूर्वी तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव हे मोलगी व मोलगीपासून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या पिंपळखुटा, ता.अक्कलकुवा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आदिवासींचे प्रश्न कार्यकर्त्यांकडून जाणून घेतले. त्यांच्या समोर कार्यकर्त्यांनी वनहक्क अंमलबजावणीतील संथगती, वनगावांचे प्रश्न, रोजगार, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, वीज, पाणी, सिंचनसुविधा याबाबतचे विविध प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर तत्कालीन राज्यपाल राव हे आदिवासींचे प्रश्न ऐकुण खूप भावूक झाले आणि या भागातील आदिवासींसाठी राजभवनाचे द्वारे २४ तास खुले राहतील अशी ग्वाही देत मोलगी स्वतंत्र तालुक्याची निर्मितीचा प्रश्नावर गांभिर्याने विचार करण्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र काही दिवस प्रशासनाने या भागावर लक्ष केंद्रीत केले. पुन्हा जैसे थे स्थिती झाली. याच भागातील भगदरी, ता.अक्कलकुवा हे गाव राज्यपाल दत्तक गाव म्हणून जाहीर झाले. तेथे प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले. त्या ठिकाणीही मध्यंतरी राज्यपाल येणार असल्याबाबत दोन वेळा दौरे देखील जाहीर झाले होते. परंतु काही कारणास्तव ते दौरे रद्द झाले. पण भगदरीतील विकास कामे आणि त्यातील भ्रष्टाचाराची चर्चा मात्र चर्चेत राहिली. या ठिकाणी कृषी व वन विभागाने केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यावेळी यासंदर्भात चौकशीच्या मागण्या झाल्या पण त्याकडे गांभिर्याने लक्ष घातले गेले नाही. किमान राज्यपालांचा उद्याच्या दौºयानिमित्ताने प्रशासन हा विषय गांभिर्याने घेईल अशी अपेक्षा आहे.
या दौºयानिमित्ताने आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी व त्यांना स्थानिक स्तरावर रोजगार देण्यासाठी, रस्ते नसलेल्या ३०० पेक्षा अधीक लोकसंख्येच्या गावांना रस्त्याने जोडण्यासाठी व वीज नसलेल्या गावांना वीज पोहचविण्यासाठी चर्चा होईल. सिकलसेल, कुपोषणासंदर्भातही चर्चा होतील. वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात सुरू असलेली दिरंगाईचे प्रश्न उपस्थित होतील. मोलगी तालुका निर्मिती तसेच तेथे विविध कार्यालये सुरू करण्याबाबत देखील उहापोह होईल. अर्थात राज्यपालांच्या या दौºया निमित्ताने जुन्याच प्रश्नांची पुन्हा उकल होईल पण, राज्यपाल महोदय या वेळी तरी हे प्रश्न अधीक गांभिर्याने घेतील व प्रशासन आणि सरकारला खडसावून ते प्रश्न सोडविण्याबाबत आदेश देतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौरा निमित्ताने मोलगी आणि भगदरी येथील शासकीय इमारतींचे बाह्य रूप बदलले असून सर्व काही चकाचक झाले आहे. मोलगी येथील विश्राम गृह, ग्रामिण रुग्णालय, पोषण पुनर्वसन केंद्र, पशुसंवर्धन केंद्र, आश्रमशाळा आदी विविध इमारतींना रंगरंगोटी करून सज्ज ठेवण्यात आले आहे. या सज्जतेमुळे बाह्य विकासाचे प्रदर्शन झाले असले तरी अंतर्गत सुविधा व व्यवस्था मात्र नियमित आणि अखंडपणे आदिवासींच्या सेवेसाठी तत्पर करण्याची गरज आहे.