लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोहिदा येथे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना सोमवारी घडली होती़ दरम्यान बुधवारी पुन्हा बेलीपाडा येथे अस्वलाने हल्ला करुन तिघांना जखमी केले होते़ या हल्ल्यानंतर तालुक्यातील शेतकरी भयभीत असून तालुक्यात सात बिबटे आणि सहा अस्वल तूर्तास भटकंती करत असल्याने या भितीत वाढ झाली आहे़मोहिदा येथील शेतकरी शरद चव्हाण यांच्या हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याचा अहवाल गुरुवारी वन विभागाला मिळाला आहे़ यातून अद्याप येथील प्राण्याबाबत संभ्रम कायम दर्शवण्यात आला आहे़ दुसरीकडे बेलीपाडा येथे हल्ला करणारे अस्वल हे मादी अस्वल असावे असा अंदाज आहे़ अस्वलासोबत त्याचे पिलू असल्यावर त्याला संबधितांकडून धोका होवू शकतो म्हणून त्याने तिघांवर हल्ला केला असावा असा अंदाज आहे़ यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत़ तब्बल १५ हजार ९९८ हेक्टर क्षेत्र असलेल्या तळोदा तालुक्यातील वनक्षेत्रात गेल्या काही वर्षातील प्राणी शेतशिवारात येण्याचे प्रमाण हे वाढले आहे़ वनापेक्षा ऊस आणि बागायती क्षेत्रातच मुक्काम ठोकणाºया या प्राण्यांचे हल्ले वेळोवेळी त्यांचे अस्तित्त्व दाखवून देत आहेत़ तालुक्यात चार ते पाच ठिकाणी बिबट्या किंवा अस्वलाच्या हल्ल्यात यापूर्वी काहींच बळीही गेले आहेत़ सोमवार आणि बुधवारच्या घटनेनंतर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती़गेल्या सहा महिन्यात मादी बिबट्याचा मोहिदा, कळमसरे आणि मोड शिवारात सातत्याने संचार वाढला असल्याची माहिती देऊन पिंजरे लावून जेरबंद करण्याची मागणी करुनही कारवाई करण्यात आलेली नाही़ तीन दिवसांपासून लावलेल्या ट्रॅप कॅमेºयांमध्ये कोणत्याही प्रकारे जनावरे दिसून येत नसल्याचे सांगण्यात येत नसले तरी किमान १० दिवस या भागात गस्त व कॅमेरे लावून धरल्यास हिंस्त्र प्राण्यांना हुसकावून लावणे शक्य होणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़
वनविभागाने नुकतेच बुद्ध पौर्णिमेला प्राण्यांच्या नोंदी घेतल्या होत्या़ १५ हजार हेक्टरपैकी वाल्हेरी, कुंडेश्वर आणि इच्छागव्हाण या भागात सात ते आठ अस्वल असल्याचे निष्पन्न झाले होते़ यासह वनक्षेत्रात सहा ते सात बिबटे असल्याची माहिती मिळाली होती़ उन्हाळ्यात हे प्राणी वनापेक्षा शेतशिवारात येणे पसंत करतात़ याठिकाणी पाणी आणि किरकोळ स्वरुपात अन्न मिळत असल्याने ते येथे मुक्काम ठोकत आहेत़ यातून मग संघर्षाचे प्रसंग उभे राहत आहेत़ यात शेतकऱ्यांचेच अधिक नुकसान होत असल्याने वनविभागाने ठोस अशी भूमिक घेत कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़
मोहिदा गावालगत गेल्यावर्षी मादी बिबट्या दोन पिलांसह फिरत असल्याचे दिसून आले होते़ येथील ऊसाच्या शेतात कालांतराने बिबटाची दोन पिले आढळून आली होती़ त्यांना वनविभागाने नागपूर येथे पाठवले होते़४गेल्या आठवड्यात मोड गावापासून काही अंतरावर कृष्णा सदू माळी यांच्या बाजरीच्या शेतात दोन बिबटे असल्याची माहिती देण्यात आल्यानंतर फटाके फोडून शेतकऱ्यांनी बिबट्या पळवून लावला होता़ परंतू वनविभागाने सातत्याने याकडे दुर्लक्ष केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़ या भागात कायम गस्त करणे शक्य नसले तरी वन्यप्राण्यांना वनक्षेत्रात ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत कारवाई करण्याची गरज असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़