कोरोना चाचण्या आणि मोक्कावर मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:53 PM2020-09-25T12:53:42+5:302020-09-25T12:53:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या दैनंदिन किमान ५०० चाचण्या कराव्या, आॅक्सीजन बेडची संख्या वाढवावी तसेच स्थलांतरीत मजुरांना रोखण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या दैनंदिन किमान ५०० चाचण्या कराव्या, आॅक्सीजन बेडची संख्या वाढवावी तसेच स्थलांतरीत मजुरांना रोखण्यासाठी स्थानिक स्तरावरच कामे उपलब्ध करून द्यावी अशा सुचना विभागीय महसूल आयुक्तांनी दिल्या होत्या. त्या सुचनांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. दरम्यान, विशेष पोलीस महानिरिक्षकांनीही गुटखा, वाळू वाहतूक आणि रस्ता लुटमारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या दिलेल्या सुचनांची पोलीस दलातर्फे लवकरच अंमलबजावणी केली जाण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात तीन दिवसांच्या अंतराने नव्यानेच रुजू झालेले विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे व विशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकर यांनी जिल्ह्यात भेटी दिल्या होत्या. त्यांच्या दौऱ्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन अलर्ट झाले होते. दौरा यशस्वी करण्यासाठी दोन्ही विभागांनी कंबर कसली होती. दोन्ही अधिकाऱ्यांचा दौरा यशस्वी झाला देखील. त्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करण्यासाठी मात्र आता दोन्ही विभागांची कसरत सुरू आहे.
५०० कोरोना चाचण्यांसाठी...
विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपल्या दौºयात कोविडची स्थिती आणि एकुण उचारासंदर्भातील नियोजन याची माहिती जाणून घेतली. कोविड उपचार कक्षाला देखील त्यांनी थेट भेटी देऊन तेथे दाखल रुग्णांशी त्यांनी चर्चा केली व सेवा, सुविधांविषयी त्यांच्याकडून जाणून घेतले. यावेळी त्यांना आढळून आलेल्या काही त्रुटींबाबत त्यांनी सुचना केल्या. याशिवाय दररोज किमान ५०० कोरोना चाचण्या झाल्या पाहिजे अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने नियोजन केले असले तरी सद्या तरी ३०० च्या वर कोरोना चाचण्या जात नसल्याची स्थिती आहे. अर्थात तेवढे स्वॅब संकलन होत नसल्याची स्थिती आहे. शिवाय येथील आरटीपीसीआर लॅब मध्ये दररोज केवळ तीनच शिफ्ट होतील एवढीच कर्मचारी संख्या आहे. त्यामुळे ५०० चाचण्यांचे टार्गेट होणे तारेवरची कसरतच ठरणार आहे.
नवीन कोविड कक्ष सुरू करण्यासाठी तळोदा आणि नवापूर येथे प्रयत्न राहणार आहे. याशिवाय आॅक्सीजन बेडची संख्या देखील वाढविण्यात भर देण्याच्या सुचना त्यांनी केल्या होत्या. नंदुरबारात स्थानिक ठिकाणी आॅक्सिजन प्लॉन्ट सुरू होईल तेव्हाच बेडचीही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
याशिवाय पाणंद व शिवार रस्त्यांच्या कामाबाबत आवश्यक अॅप तयार करण्यात यावे अशा सुचना देखील त्यांनी दिल्या होत्या. त्या दृष्टीने अद्याप काही हालचाली नसल्याचे चित्र आहे. राजस्व अभियानात नव्याने काही करण्यासारखे नसल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले होते.
गुटखा तस्करीवर लक्ष केंद्रीत
विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी आंतरराज्य सिमेवरून होणारी गुटखा तस्करीवर विशेष फोकस केला होता. या तस्करीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी सुचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने पोलीस विभागाने नियोजन केले आहे. परंतु गुटखा तस्करही आता सावध झाले आहे. नव्याचे नऊ दिवस म्हणून काही दिवस गुटखा तस्करी बंद ठेवण्यावर तस्करांचा भर राहणार आहे. त्यामुळे धानोरा येथील कारवाई वगळता दुसरी कारवाई झालेल नाही.
जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा व नंदुरबार तालुक्यात रस्ता लुटीच्या घटना गेल्या काळात वाढल्या होत्या. अशा घटनांना पायबंद घालता यावा यासाठी अशा गुन्हेगारांवर थेट मोक्का लावण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. त्यानुसार रस्ता लुटीच्या गुन्ह्यातील आरोपींवरील आरोप सिद्ध व्हावे यासाठी आता पोलिसांनाही त्या केसेस अधीक स्ट्राँग कराव्या लागणार आहेत. गुटखा, वाळू तस्करीच्या माध्यमातूनच रस्ता लुटीतील काही डॉन तयार झाले होते. त्यांच्यावर आता बºयापैकी वचक असला तरी न्यायालयातील त्यांच्या केसेस अधीक स्ट्राँग लावून धरणेही आवश्यक आहे.
४ई-फेरफार, महाराजस्व अभियान, आधार प्रमाणिकरण, आधार नोंदणी, पी.एम.किसान योजना, पीककर्ज वाटप, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना, कापूस खरेदी यासह मनरेगा अंतर्गत अधिकाधिक कामे घेण्यात यावीत. सिंचन विहीरीची अपूर्ण कामे पूर्ण करावीत. मंजूर असलेले घरकुलाची कामे सुरु होण्याच्या दृष्टीने नियोजन. पाणंद व शिवार रस्त्यांच्या कामाबाबत आवश्यक अॅप तयार करण्यात यावे. ‘विकेल ते पिकेल’ योजनेचा अधिकाधिक प्रसार करावा या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्नशील आहे.
४गुन्हेगारी दत्तक योजनेसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. विशेष पोलीस महानिरिक्षकांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने ते वैयक्तिक या योजनेचा फॉलोअप घेणार आहेत. जिल्ह्यातील ज्या महामार्ग, राज्यमार्ग व जिल्हा मार्गांवर वारंवार अपघात होतात. त्या रस्त्याचे रोड ट्राफिक आॅडीट केले जाणार आहे. त्यादृष्टीने देखील वारंवार अपघात होणाºया जागांचा शोध घेण्यास सुरुवात झाली असून त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात आले आहे.