लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी झाली असून निकाल जाहीर होताच सर्वच पक्षांतील नेत्यांनी ग्रामपंचायतींवर दावा सांगितला आहे. जिल्ह्यात विशेषत: कॅांग्रेस, शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॅांग्रेस या चार पक्षात सर्वच ठिकाणी लढती होत्या. या चारही पक्षातील जिल्हा प्रमुखांनी विजयाचे दावे, प्रतीदावे केले असून त्यामुळे राजकारणाला वेगळा रंग आला आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार आपापल्या नेत्यांच्या कार्यालयात जाऊन आनंदोत्सव साजरा करीत होते.
निम्मेपेक्षा अधीक ग्रा.पं.वर भाजपचे वर्चस्व
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील जनतेने महाविकास आघाडी सरकारवर नाराजी दर्शविली आहे. या सरकारची निष्क्रीयता, भ्रष्टाचार व विकास शुन्य कारभाराला जनता कंटाळली आहे. त्याचेच या निकालातून चित्र दिसून येत आहे. त्यामुळे भाजपला चांगले यश मिळाले असून जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या निम्मेपेक्षा अधीक ग्रा.पं.वर भाजपला यश मिळाले आहे. -विजय चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष.
आगामी निवडणुकांसाठी पक्षासाठी शुभसंकेत
गामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या सर्वच ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेने चांगली लढत दिली. नंदुरबार आणि धडगाव तालुक्यात पक्षाला चांगले यश मिळाले असून अक्कलकुवा तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायतही शिवसेनेला मिळाली आहे. आगामी काळात सर्वच ठिकाणी भगवा फडकविण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. -डॅा.विक्रांत मोरे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
ग्रामीण मतदार पुन्हा कॅांग्रेसच्या बाजुनेच
जिल्ह्यातील जनता नेहमी कॅांग्रेसच्या पाठीशी असते हे या निवडणुकीतून पुन्हा सिद्ध झाले आहे. नवापूर आणि धडगाव तालुक्यात कॅांग्रेसचे आमदार असून तेथे पक्षाला मोठे यश मिळाले आहे. याशिवाय इतर ठिकाणीही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी जिल्ह्याला चांगला न्याय दिला त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला यश मिळाले आहे. -दिलीप नाईक, कार्याध्यक्ष, कॅांग्रेस.