सीईओ आर.के.गावडे यांचा संकल्प- ‘व्हिजन’ ठेऊन जिल्हा परिषदेत काम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 12:39 PM2020-10-26T12:39:38+5:302020-10-26T12:39:47+5:30
व्हिजन ठेऊन काम केले तर ते तडीस नेता येते. जिल्ह्यातील दुर्गम भागात काम करतांना आपले तेच सूत्र राहणार आहे. -आर.के.गावडे, सीईओ, जि.प.
संडे स्पेशल मुलाखत
मनोज शेलार।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिल्ह्यात या आधी अर्थात सरदार सरोवर प्रकल्पाचा उपजिल्हाधिकारी म्हणून तळोदा व केवडीया भागात काम केले आहे. त्यामुळे दर्गम भागाशी आपली पूर्वीपासूनच नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेत काम करतांना त्या अनुभवाचा फायदा मिळणार आहे. आरोग्य, कुपोषण, शिक्षण, दळणवळण, रोजगार यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहील. लोकाभिमुख प्रशासनावर आपला भर राहणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के.गावडे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
आपली प्रशासकीय कारकिर्दविषयी काय सांगाल?
मी १९९४ साली एमपीएससी झालो. १९९५ साली उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. सरदार सरोवर प्रकल्प तळोदा व केवडीया उपजिल्हाधिकारी, नाशिक एमआयडीसी रिजनल ऑफिसर, कुंभमेळा प्रोजेक्ट ऑफीसर, निफाड प्रांताधिकारी, मालेगाव येथे उपजिल्हाधिकारी आदी ठिकाणची कारकिर्द संस्मरणीय राहिली. आता आयएएस पदोन्नती मिळाली आणि पहिली नियुक्ती नंदुरबार जिल्हा परिषद सीईओपदी झाली.
दुर्गम भागाचे प्रश्न कसे सोडविणार?
तळोदा, केवडीया येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम करतांना हा परिसर पिंजून काढला आहे. त्यामुळे त्या अनुभवाच्या जोरावर या भागात योजना, निधी आणणार आहे. नियुक्ती झाल्याबरोबर एक व्हिजन तयार केले आहे. त्यावर काम करून दुर्गम परिसरात आरोग्य, दळणवळण, शिक्षण, रोजगार यांना प्राधान्य दिले जाईल. व्हिजन ठेऊन काम केले जाईल.
फ्लाईंग स्कॅाड नेमणार...
दुर्गम भागात आरोग्य, शिक्षणसह इतर अधिकारी, कर्मचारी राहत नसल्याच्या नेहमीच्याच तक्रारी असतात. त्यावर उपाय म्हणून फ्लाईंग स्कॅाड नेमणार आहे. ते उपस्थितीवर लक्ष ठेवतील आणि ठराविक कालावधीत अहवाल देतील. आपण डिसीप्लीनला प्राधान्य देणारे आहोत.
मायक्रोप्लानिंगने कुपोषण हद्दपार...
कुपोषणाची समस्या या भागाला नवीन नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक योजना, कृती कार्यक्रम झाले आहेत. आपण देखील मायक्रप्लानिंगने काम करणार आहोत. जनजागृती आणि प्रबोधन यावर भर देऊन योजना राबविवणार आहोत. माता, बालमृत्यू कमी करण्यासह कुपोषण कमी करण्यावर आपले लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य घेणार आहे.