आयपीएल २०२६ च्या सुरुवातीला आपल्या धडाकेबाज कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा पंजाब किंग्सचा संघ सध्या संघर्ष करताना दिसत आहे. सलग चार सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने पंजाबची गाडी रुळावरून घसरली असल्याचे पाहायला मिळत आहे. या सलगच्या पराभवानंतर सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर, संघाची मालकीण प्रीती झिंटा हिने मौन सोडले असून खोटी माहिती पसरवणाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले आहे.
यंदाच्या हंगामाची सुरुवात पंजाब किंग्सने अत्यंत दिमाखात केली होती. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर पंजाबचा संघ सरस ठरत होता. इतकेच नव्हे तर गुणतालिकेतही पंजाबने अनेक दिवस पहिल्या क्रमांकावर आपला ताबा मिळवला होता. मात्र, गेल्या काही सामन्यांपासून संघाची लय बिघडली आहे. फलंदाजांचे अपयश आणि मोक्याच्या क्षणी गोलंदाजांनी दिलेली अधिकची धावसंख्या यामुळे पंजाबला सलग चार सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
पंजाब किंग्सने आपले पहिले सहा सामने सलग जिंकले. तर, कोलकाताविरुद्धचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. केवळ पहिल्या सात सामन्यांत पंजाबच्या खात्यात एकूण १३ गुण जमा झाले. परंतु, राजस्थान रॉयल्सकडून मिळालेल्या पराभवानंतर पंजाबच्या संघाची घसरण सुरूच आहे. त्यानंतर सोशल मीडयावर पंजाबच्या खेळाडूंच्या फिटनेसबद्दल चर्चा सुरू झाल्या. काहींनी पंजाबच्या संघातील खेळाडू श्रेयस अय्यरवर नाराज असल्याचा आणि संघात अंतर्गत कलह असल्याचा दावा केला आहे. गेल्या आठवड्याभरापासून हा प्रकार सुरू आहे. यावर प्रिती झिंटाने संताप व्यक्त केला.
प्रिती झिंटाची सोशल मीडियावर पोस्ट
"टीका आणि जाणूनबुजून केलेली बदनामी यात फरक असतो. खेळाशी संबंधित चर्चा किंवा तांत्रिक मुद्द्यांवर होणाऱ्या टीकेला माझा मुळीच विरोध नाही. मात्र, या टीकेच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीची, संघाची किंवा ब्रँडची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. केवळ खात्रीशीर माहितीच पुढे न्यावी आणि सर्वांनी जबाबदारीने वागावे," असेही आवाहन तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.