लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लग्न समारंभात ५० पेक्षा अधीक व्यक्ती आढळून आल्यास वर, वधूंचे आई-वडील व भटजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे एकतर लग्न समारंभ पुढे ढकलावे किंवा गर्दीवर नियंत्रण ठेवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात सर्वत्र दक्षता घेतली जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणले जात आहे. सर्व सामुहिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. परंतु शहरी आणि ग्रामिण भागात अजूनही लग्न समारोह मोठ्या व व्यापक प्रमाणात साजरे केले जात आहेत. अशा ठिकाणी गर्दीवर कुठलेही नियंत्रण ठेवले जात नाही. आवश्यक उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशा ठिकाणी संसर्गाची शक्यता असते. एकीकडे प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे तर दुसरीकडे लग्न समारंभ आयोजित करणारी मंडळी कुठलीही काळजी घेत नाहीत. प्रशासनाच्या उपाययोजनांवर पाणी फिरत आहे. ही बाब लक्षात घेता आता लग्न समारंभ आयोजनावरच प्रशासनाने कडक निर्बंध आणले आहेत. याबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सांगितले, याआधीच मॅरेज लॉन्स, मंगल कार्यालये यांना बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.यापुढे कुणी बुकींग केले असतील तर ते रद्द करून द्यावे. सर्व मंगल कार्यालय व लॉन्स यांना नियमांचे आणि आदेशाचे पालन करण्याच्या सुचना लेखी स्वरूपात दिल्या आहेत. असे असतांनाही कुणी लग्न समारंभ, सार्वजनिक, सामुहिक कार्यक्रम यासठी मंगल कार्यालय, हॉल, लॉन्स उपलब्ध करून दिले तर त्यांच्यावर भादंवी कलमान्वये कारवाई करण्यात येणार आहे.घरगुती स्वरूपात आयोजित सर्व लग्न समारंभांवरही नियंत्रण आणले जात आहे. त्यासाठी ५० पेक्षा जास्त लोकांनी अशा ठिकाणी उपस्थित राहू नये यासाठी सुचना देण्यात येत आहे. त्या त्या तहसीलदारांना, पोलीस निरिक्षकांना तशा सुचना दिल्या जात आहेत.तरीही ५० पेक्षा अधीक लोकं दिसून आल्यास तेथील लग्न समारंभ आयोजित करणारे वधू व वर यांचे आई-वडील व भटजी यांच्यावर थेट कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे घरगुती स्वरूपात व मोजक्याच अर्थात ५० जणांच्या उपस्थितीतच लग्न समारंभ आयोजित करावा असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी केले आहे.अखेर आदेश... आवाहन करूनही जनता ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे लग्न समारंभामधील उपस्थितीवर मर्यादा आणाव्या लागल्या असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.कारवाईचे अधिकार... प्रशासनाला कारवाईचे अधिकार आहे. आपत्ती व्यवस्थापनव पोलीस कायद्यान्वये कारवाई होईल.
खबरदार, लग्नात गर्दी केली तर थेट कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:50 PM