ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यात दहीवडा खाल्ल्यानंतर एकूण ५८ लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, यात २७ मुलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावात खळबळ माजली. दहीवडा आणि पाण्याचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ही घटना दशरथपूर तालुक्यात असलेल्या पटापूर गावात शुक्रवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका स्थानिक विक्रेत्याच्या गाडीवरील दहीवडा खाल्ल्यानंतर २७ मुलांसह ५८ जणांना उलट्या, ताप आणि पोटदुखीचा होऊ लागला. यानंतर त्यांना ताबडतोब दशरथपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्र आणि जाजपूर येथील जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व ५८ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. उपचारानंतर २१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने तीन पथके स्थापन केली आहेत.
या घटनेची माहिती मिळताच, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मुकेश महालिंग यांनी जाजपूर येथील रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेतली. पत्रकारांशी बोलताना महालिंग म्हणाले की, "२७ मुलांसह एकूण ५८ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक अहवालांनुसार, दही वडा खाल्ल्यामुळे ही घटना घडल्याचे दिसून येते. आम्ही या खाद्यपदार्थाचे आणि पाण्याचे नमुने गोळा केले असून, ते तपासणीसाठी पाठवले आहेत."
आरोग्याची काळजी घ्या
गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही घराबाहेर पडणार असाल, तर अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कोणताही खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी दोनदा विचार केला पाहिजे. बाहेरचे अन्न खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.