रेमडेसिवीरच्या टंचाईला राजकारणाचा आधार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST2021-04-04T04:31:39+5:302021-04-04T04:31:39+5:30

जिल्ह्यात गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली, त्यावेळी लॉकडाऊनमुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. आधीच आजाराबाबतची वेगळी भीती आणि त्यातच गोरगरीब ...

The basis of politics is the shortage of Ramdesivir ... | रेमडेसिवीरच्या टंचाईला राजकारणाचा आधार...

रेमडेसिवीरच्या टंचाईला राजकारणाचा आधार...

जिल्ह्यात गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली, त्यावेळी लॉकडाऊनमुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. आधीच आजाराबाबतची वेगळी भीती आणि त्यातच गोरगरीब मजूर व स्थलांतरितांचे, झोपडपट्टीतील लोकांचे खूपच हाल झाले. अशा वेळी सर्वच क्षेत्रातील सेवाभावी लोक माणुसकीच्या नात्याने मदतीसाठी पुढे आले होते. त्या माणुसकीच्या वातावरणात कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील काळ जिल्हावासीयांसाठी निश्चितच फारसा वेदनादायी ठरला नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यात अर्थातच या वर्षी मार्चनंतर परिस्थिती खरोखरच हाताबाहेर जात असल्याचीच स्थिती आहे. आजही अनेकांना मदतीची प्रतीक्षा आहे, पण या मदतीसाठी गेल्या वर्षासारखे हात दिसून येत नाहीत. खास करून रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णांवर योग्य उपचारासाठी पुरेशी व्यवस्था झाली नाही. जिल्ह्यात मोठे उद्योगपती अथवा मोठ्या संस्था नसल्याने, मेट्रो सिटीत जसे सेवाभावी तात्पुरते कोरोना हॉस्पिटल सुरू झाले, तसे येथे सुरू झाले नाही. आहे त्या व्यवस्थेतच यंत्रणाही अपुरी आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा अथवा सामाजिक पाठबळ आहे, असे रुग्ण जिल्ह्याबाहेरील मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत, परंतु ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांना स्थानिक स्तरावरच माफक दरात उपचाराच्या सुविधा शोधाव्या लागत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे ठरत आहे, ते म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शन. हे इंजेक्शन खासगी मेडिकलवर मिळणे दुरापास्त झाले आहे. आहे त्या ठिकाणीही दर अव्वाच्या सव्वा असल्याने सर्वसामान्यांची आस तेथेच तुटते. इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. काहींचे या इंजेक्शनअभावी मृत्यू झाल्याच्याही नातेवाइकांच्या तक्रारी आहेत. अशा स्थितीत या इंजेक्शनचे महत्त्व जाणून सर्वप्रथम माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पुढाकार घेऊन गेल्या काही महिन्यांपासून सवलतीच्या दरात या इंजेक्शनची सुविधा सुरू केली होती. या महिन्यात रुग्णांची वाढती संख्या पाहता, हिरा प्रतिष्ठानचे संस्थापक हिरालाल चौधरी यांनी सवलतीच्या दरात या इंजेक्शनची सेवा सुरू केली आहे. हीच प्रेरणा घेऊन शहादा येथेही सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सवलतीच्या दरात इंजेक्शन सेवा सुरू केली आहे. एकूणच या सेवेसाठी पुढे आलेली ही मंडळी निश्चितच राजकारणातील आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी या सेवेला निश्चितच राजकीय झालर दिसून येत असली, तरी वास्तवात मात्र ही सेवा अनेकांची आयुष्यवर्धिनी ठरत आहे. त्यामुळे या सेवेचे निश्चितच कौतुक केले पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहता, रुग्णांची अवस्था गंभीर होत असल्याने या सेवेची व्यापकता अजून वाढण्याची आवश्यकता आहे.

Web Title: The basis of politics is the shortage of Ramdesivir ...