आधीच अवकाळी पावसाने बलवंड परिसरातील शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात राहिलेली पिके शेतकरी वाचविण्याच्या प्रयत्नात असताना बोरतलाव शिवारातील दोन ट्रान्सफाॅर्मर जळाल्याने शेतक-यांच्या मागील संकटांची मालिका सुरूच आहे. गत आठवडाभरापासून नवीन ट्रान्सफाॅर्मर मिळविण्यासाठी शेतकरी वीजमंडळाच्या कार्यालयात घिरट्या घालत असून त्यांंची आर्त हाक कोणीही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाही. परिणामी, पाण्याअभावी उभी पिके डोळ्यांदेखत जळण्याच्या मार्गावर आहेत. आधीच निसर्गाच्या कचाट्यात सापडलेला शेतकरी वीजमंडळाच्या आडमुठ्या धोरणामुळे संताप व्यक्त करीत आहे. आधी वीजबिल भरा, मग ट्रान्सफाॅर्मर मिळेल, या वीजमंडळाच्या धोरणामुळे शेतकरी पुन्हा एकदा कचाट्यात सापडला असून आम्हास कोणीही वाली उरला नाही, अशी भावना शेतक-यांनी व्यक्त केली आहे. दोन दिवसांत ट्रान्सफाॅर्मर बदलून मिळाला नाही तर नंदुरबार वीजमंडळ कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा शेतक-यांनी दिला आहे.
शासनाने तीन वर्षांपासून कृषी वीजबिले देणे बंद केले आहे. म्हणून बिले भरावी, तर कशी आणि किती. आधी शेतीला २४ तास वीज द्या, मगच वीजबिल मागा.
-बाजीराव पाटील, शेतकरी, बलवंड