लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात नियमांचे उल्लंघन करुन प्रवासी वाहतूक करणा-या तीन चाकी रिक्षा वाहतूक शाखेच्या पथकाने जप्त केल्या. गुरुवारी दिवसभरात ३१ रिक्षा पथकाने ताब्यात घेतल्या होत्या. यातील २७ रिक्षाचालक-मालकांना शुक्रवारी न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रूपयांचा दंड केला.ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी प्रवासी तीन चाकी रिक्षांचा आधार घेतात. यातून गेल्या काही काळात या रिक्षांची संख्या वाढली आहे. प्रवासी वाहतूकीचा योग्य तो परवाना, पीयूसी, चालकांचे परवाने तसेच इतर कागदपत्रांविनाच ही वाहने चालवली जातात. दरम्यान या वाहनांवर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनात पथकाने कारवाई सुरु केली होती. यांतर्गत शहरातील विविध भागात पथके नियुक्त करत ग्रामीण भागातून येणा-या रिक्षा जप्त करण्यात आल्या. यातून दिवसभरात ३१ तीनचाकी रिक्षा जप्त करुन आणण्यात आले. या वाहतूकदारांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. याठिकाणी २७ जणांना प्रत्येकी दोन हजार रूपये दंडाची शिक्षा देण्यात आली. सर्वांनी एकूण ५४ हजार रूपयांच्या दंडाचा भरणा केला. दुसरीकडे उर्वरित चार जणांना २०० रूपयांचा दंड देण्यात आल्याची माहिती आहे.
नंदुरबारात अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 12:38 PM