महिला तलाठ्यांची लाचखोरीत भागीदारी; १६ हजारांची लाच घेताना दोघी रंगेहात पकडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:19 IST2025-06-04T16:16:49+5:302025-06-04T16:19:17+5:30
शेतजमीनीचा फेर घेण्यासाठी ४० हजारांची मागणी करत तडजोडीअंती १६ हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

महिला तलाठ्यांची लाचखोरीत भागीदारी; १६ हजारांची लाच घेताना दोघी रंगेहात पकडल्या
किनवट/गोकुंदा : कोणतेही शासकीय काम असो, दिल्या-घेतल्याशिवाय होत नाही असा सर्वसामान्यांचा समज आहे. परंतु त्यास प्रत्यक्ष कृतीतून जोड देण्याचे काम किनवट येथील महिला तलाठ्यांच्या जोडगोळीने केले आहे. शेतजमीनीचा फेर घेण्यासाठी ४० हजारांची मागणी करत तडजोडीअंती १६ हजार रुपये स्वीकारताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कार्यवाही ३ जून रोजी किनवट शहरातील गोकुंदा भागात करण्यात आली.
अवैध व्यवसाय रोखण्यासाठी तैनात असलेला पोलिस अधिकारी व त्याला सहायभूत ठरणाऱ्या खाजगी इसमाने अवैध व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी एसीबीने कार्यवाही केली होती. त्यास अवघे सहा दिवस झालेले असताना महसूल विभागाच्या दोन महिला तलाठ्यांना लाच घेताना एकत्रित अटक झाल्याने किनवटमध्ये खळबळ उडाली आहे. भाग्यश्री भीमराव तेलंगे वय ३४, सज्जा, निचपूर व सुजाता शंकर गवळे वय २५, सज्जा-कणकवाडी ता. किनवट असे कारवाई झालेल्या तलाठ्यांची नावे आहेत. वडीलोपार्जीत जमिनीचा फेर अर्जदाराच्या पत्नीच्या नावे लावण्यासाठी तक्रारदारांनी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या कामाच्या अनुषंगाने तक्रारदार तलाठी भाग्यश्री तेलंगे यांना भेटले असता त्यांनी ४० हजारांची मागणी केली. तडजोडीअंती १७ हजार रुपये देण्याचे ठरले. एसीबी पथकाने ३ जून रोजी सापळा रचून कार्यवाही केली. यावेळी लोकसेविका तलाठी तेलंगे यांनी तलाठी गवळे यांना भेटण्यास सांगीतले. त्यांनी तक्रारदारांची फाईल घेवून तेलंगे यांच्याशी चर्चा करुन परत आल्यावर ठरल्याप्रमाणे पैसे देण्यास सांगीतले.
आजच निघाले होते बदली आदेश
महसूल विभागात विनंती अर्जावरुन तलाठ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. एसीबीच्या गळाला लागलेल्या तलाठी भाग्यश्री तेलंगे यांची बदली झाली होती तसेच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. मात्र पैशांच्या हव्यासापोटी त्यांनी अन्य तलाठी सहकाऱ्यासोबत संगनमत करुन जुन्या अर्जाचा निपटारा करुन अधिकची माया जमवण्याच्या उद्देशाने आर्थित व्यवहार केले व एसीबीच्या ट्रॅपमध्ये अलगद अडकल्या.
महसूल विभागाला ग्रहण
मंत्री नरहरी झिरवळ हे दौऱ्यावर आले असता किनवटच्या तहसीलदार शारदा चोंडेकर या तेथे उपस्थित राहिल्या नाहीत. राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आता त्यापाठोपाठ किनवट तहसीलला अधीनस्त असलेल्या दोन महिला तलाठ्यांनी लाचखोरीचा कळस रचण्याचे काम केले आहे. एकंदर पाहता जिल्ह्यापासून १५० किलो मीटर दूर असलेल्या किनवटचे नाव चुकीच्या पद्धतीने समोर आणून तेथील महसूल विभाग चर्चेत आला आहे. लाच प्रकरणी किनवट ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती. सदर तलाठ्यांच्या घराची झडतीही सुरु आहे. एसीबीच्या पोलिस निरीक्षक प्रिती जाधव, सपोउपनि. शेख रसूल, अरशद अहेमद खान, सयद खदीर, गजानन राऊत यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.