संघाने नथुरामचा विचार बाजूला ठेऊन, मनुस्मृतीची होळी करून संघाने संविधान स्वीकारावे : सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:53 IST2025-09-29T14:52:09+5:302025-09-29T14:53:38+5:30
मूठभर लोकांच्या हाती सत्ता ठेवण्याचा डाव : नथुरामचा विचार बाजूला ठेवावा

The Sangh should put aside the idea of Nathuram, end Manusmriti and accept the Constitution: Sapkal
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदा २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन असून, त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन आहे. संघाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघावर हल्लाबोल केला. संघाने नथुरामचा विचार बाजूला ठेवावा, मनुस्मृतीची होळी करून संघ बरखास्त करून संविधानाचा स्वीकार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
मेडिकल चौक येथे काँग्रेस कमिटीच्या नागपूर पदवीधर मतदारसंघ दक्षिण नागपूर पदवीधर नोंदणी कार्यालयाचे रविवारी उद्घाटन झाले. त्यावेळी सपकाळ पत्रकार परिषदेत बोलत होते. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अॅड. अभिजित वंजारी, गिरीश पांडव, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, प्रसन्ना तिडके, गुड्डू तिवारी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसची विचारधारा संविधानावर, करुणा व समतेवर आधारित आहे. मात्र, संघाची विचारसरणी मनुस्मृतीतील भेदभाव, विषारी आणि विखारी प्रचारावर आधारलेली असल्याची टीका सपकाळ यांनी केली.
भगवान बुद्ध, महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समतेच्या तत्त्वज्ञानाला नाकारणारेच मनुवादी होते. वारकरी संप्रदायाने 'आपण सर्व एक आहोत' हे तत्त्वज्ञान दिले. काँग्रेस त्याच तत्त्वज्ञानावर आधारित संविधानाच्या मार्गाने चालते, असे सपकाळ म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यात संघाचा सहभाग नव्हता, उलट संघाने इंग्रजांची व्यवस्था मान्य केली होती, असा आरोपही त्यांनी केला.
शेतकऱ्यांना ५० हजारांची मदत व कर्जमाफी द्या
- अतिवृष्टी व पुरामुळे संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सपकाळ आक्रमक झाले. काँग्रेस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली आहे. पण, सरकारने अद्याप मदत केली नाही.
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार, जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना ५ २ लाखांची मदत, कर्जमाफी जाहीर करून रब्बी पिकासाठी बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.