साहित्य संघाचा नवा 'गांधी मार्ग' ! विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी गिरीश गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 20:06 IST2026-03-16T13:34:45+5:302026-03-16T20:06:19+5:30
Nagpur : शतकभराच्या प्रवासात विदर्भ साहित्य संघाने अनेक चढउतार अनुभवले. साहित्यिक चळवळीचे केंद्र म्हणून या संस्थेने विदर्भाच्या वैचारिक आयुष्याला दिशा दिली.

Sahitya Sangh's new 'Gandhi Marg'! Girish Gandhi as the president of Vidarbha Sahitya Sangh
राजेश शेगोकार
नागपूर : तकभराच्या प्रवासात विदर्भ साहित्य संघाने अनेक चढउतार अनुभवले. साहित्यिक चळवळीचे केंद्र म्हणून या संस्थेने विदर्भाच्या वैचारिक आयुष्याला दिशा दिली. मात्र, यंदाची निवडणूक संघाच्या इतिहासातील आणखी एका निर्णायक वळणाची नोंद करून गेली. शब्दांशी खेळ करणाऱ्या साहित्यिकांच्या नेतृत्वासाठीची ही निवडणूक असली, तरी प्रत्यक्षात "शब्द फसवे असतात, आकडे खरे बोलतात" या वास्तवाचीच पुनरावृत्ती झाली. त्या आकड्यांच्या खेळात गिरीश गांधी यांनी बाजी मारली. प्रतिस्पर्ध्यापेक्षा मिळालेल्या मतांचे अंतर पाहता, मतदारांनी त्यांचे नेतृत्व जणू काही डोक्यावर घेतल्याचे चित्र दिसते. 'लोकशाही बाहेरून लादता येत नाही; ती लोकांच्या अंतःकरणातून निर्माण झाली पाहिजे', असे महात्मा गांधी म्हणायचे. गिरीश गांधीच्या या विजयी आकड्यांमध्ये मतदारांच्या अंतःकरणातून उमटलेली साद किती आणि राजकारणाच्या सावल्यांचा प्रभाव किती, हा प्रश्न पुढील काळातही चर्चेचा विषय राहणार हे नाकारता येणार नाही.
मावळते अध्यक्ष प्रदीप दाते यांनी शांतपणे केलेला संयमी प्रचार, रोज नवे आरोप करत निवडणूक ढवळून काढणारे श्रीपाद भालचंद्र जोशी व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष असूनही रिंगणात उतरलेले रवींद्र शोभणे, रंजन दारव्हेकर हे प्रमुख दावेदार होते; पण या सगळ्यां दिग्गजांना मागे टाकत गिरीश गांधी यांनी बाजी मारली. विदर्भभर असलेला त्यांचा वैयक्तिक संपर्क आणि सुसंवादाची परंपरा हे त्यांच्या विजयाचे महत्त्वाचे भांडवल होते. मात्र, त्याचबरोबर राजकीय पाठबळावर त्यांनी ठेवलेल्या अधिक विश्वासाचा आरोप त्यांना टीकेचे धनीही करून गेला. प्रचारादरम्यान झालेल्या आरोपांवर एकही प्रतिक्रिया न देण्याचा संयम पाळून आणखी कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेतली, वाद टाळला हे त्यांच्या 'गांधी' असण्याला साजेसेच झाले, परंतु निवडणुकीचे साध्य साधताना वापरलेल्या साधनांची 'शुचिता' कितपत जपली गेली, हा प्रश्न विजयानंतरही चर्चेत आहेच.
असो, या सगळ्या घडामोडींनंतर गिरीश गांधी यांच्या नेतृत्वाखाली साहित्य संघाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. गांधी हे साहित्यिक नसले तरी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा असलेला वावर, विविध पुरस्कारांनी साहित्यिकांच्या पाठीवर देत असलेली शाबासकीची थाप, अनेक संस्थांचे संचलन करण्याचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की हा 'गांधी मार्ग' नेमका कसा असेल? संस्थेचे व्यवस्थापन, विस्तार आणि आधुनिकतेकडे वाटचाल हाच मार्ग प्राधान्याने राहील की साहित्यिक मूल्यांना पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा मार्ग निवडला जाईल. नवीन नेतृत्वाने निवडणुकीतील वादांवर पडदा टाकलाच आहे, आता पारदर्शकता, विश्वास आणि साहित्यसेवेचा ध्यास जपला, तरच हा 'नवा गांधी मार्ग' साहित्य संघाच्या परंपरेला साजेसा ठरेल. शिवाय या निवडणुकीभोवती निर्माण झालेल्या 'सावल्यांचा' खेळ थांबवून आता दीर्घकाळ साहित्य संघाच्या प्रतिमेवर गिरीश 'गांधी' मार्गाचा ठसा उमटला पाहिजे अन्यथा 'सावल्या' मोठ्या झाल्या की नेतृत्व खुजे होते हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
अखेर विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत गिरीश गांधी यांचा विजय झाला आणि या संस्थेला नवे नेतृत्व लाभले. मात्र, हा निकाल जाहीर होताच एक गोष्ट स्पष्ट झाली. या निवडणुकीची चर्चा विजयापेक्षा तिच्याभोवती उभ्या राहिलेल्या वादांमुळेच अधिक रंगली. आरोप-प्रत्यारोप, राजकीय सावल्या आणि मतदान प्रक्रियेवर उपस्थित झालेले प्रश्न यामुळे ही निवडणूक केवळ नेतृत्व बदलण्यापुरती मर्यादित राहिली नाही; तर साहित्यिक संस्थांच्या लोकशाही प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उभे करून गेली.