‘पाणी भरा’ म्हटल्याचा संताप, निवृत्त ‘क्लासवन’ पतीने केला पत्नीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 11:53 AM2023-08-14T11:53:41+5:302023-08-14T11:54:33+5:30
डोक्यात होते संशयाचे ‘भूत’ : एकाच घरात राहायचे वेगळे
![Retired 'class one' husband killed his wife in nagpur | ‘पाणी भरा’ म्हटल्याचा संताप, निवृत्त ‘क्लासवन’ पतीने केला पत्नीचा खून Retired 'class one' husband killed his wife in nagpur | ‘पाणी भरा’ म्हटल्याचा संताप, निवृत्त ‘क्लासवन’ पतीने केला पत्नीचा खून](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/d6ujdrujftitbkyt_2023081067208.jpg)
‘पाणी भरा’ म्हटल्याचा संताप, निवृत्त ‘क्लासवन’ पतीने केला पत्नीचा खून
नागपूर : एका ६६ वर्षीय पतीने ५८ वर्षीय पत्नीची डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केली. पाणी भरण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला व त्यानंतर पतीने पत्नीची हत्या केली. दोघेही पती-पत्नी एकाच घरात वेगवेगळे राहात होते. कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मुकुलकुमारी सिन्हा (५८, रा. शंभूनगर) असे मृत पत्नीचे नाव असून, पुरुषोत्तम कुमार सिंह (६६) हा आरोपी पती आहे. तो सेवानिवृत्त क्लासवन अधिकारी होता. मागील अनेक वर्षांपासून त्याचा पत्नीशी वाद सुरू होता. त्यामुळेच दोघेही एकाच घरात वेगवेगळे राहात होते. पत्नीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यातून हाणामारीदेखील झाली होती व पोलिसांत तक्रारदेखील करण्यात आली होती.
रविवारी सकाळी पत्नीने पाणी भरण्यास सांगितल्यामुळे पुरुषोत्तमला राग आला. त्यावरून दोघांत वाद झाला. पती पुरुषोत्तमने शिवीगाळ सुरू केली. त्याला मुकुलकुमारी यांनीदेखील प्रत्युत्तर दिले व त्यांनीदेखील पतीला मारहाण केली. यामुळे पुरुषोत्तम संतापला व त्याने घरातून कुऱ्हाड आणली. ते पाहून पत्नीने घराच्या अंगणात धाव घेतली. मात्र, पतीने त्यांना गाठले व त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. पत्नीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
अनेक वर्षांपासून सुरू होता वाद
यापूर्वी पती पुरुषोत्तम सिन्हा आपला मानसिक छळ करत असल्याची तक्रार कोराडी पोलिसांमध्ये मुकुलकुमारीने केली होती. त्यानुसार पोलिसांनी भरोसा सेल अंतर्गत दोघांमध्ये समेट घडवून आणला होता. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. दोघेही सुशिक्षित असून, बाहेर नोकरीला आहेत. पती-पत्नी एकाच घरात वेगवेगळ्या माळ्यावर वेगवेगळे राहत होते. यांच्यामध्ये आर्थिक बाबीवरूनही मतभेद असल्याचे सांगण्यात येते.