नागपूर विभागातील ११५ विजेत्या शेतकऱ्यांना ७ लाखांची बक्षिसे; तीन शेतकऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार
By आनंद डेकाटे | Updated: February 13, 2026 18:46 IST2026-02-13T18:45:22+5:302026-02-13T18:46:49+5:30
Nagpur : रब्बी हंगाम २०२४च्या पीक स्पर्धा योजनेंतर्गत नागपूर विभागातील एकूण ११५ विजेत्या शेतकऱ्यांना ७ लाखांच्या बक्षीसे लवकरच वितरीत होणार आहेत.

Prizes of Rs 7 lakhs to 115 winning farmers in Nagpur division; State-level awards to three farmers
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रब्बी हंगाम २०२४च्या पीक स्पर्धा योजनेंतर्गत नागपूर विभागातील एकूण ११५ विजेत्या शेतकऱ्यांना ७ लाखांच्या बक्षीसे लवकरच वितरीत होणार आहेत. विभागातून तीन शेतकऱ्यांना राज्यस्तरीय, ३८ शेतकऱ्यांना जिल्हा तर ७४ शेतकऱ्यांना तालुका स्तरीय पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या योजनेंतर्गत राज्यातील १ हजार ७ शेतकऱ्यांना बक्षिस वितरीत करण्यात येणार आहे.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे व त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात भर पाडण्याच्या उद्देशाने शासन राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धांचे आयोजन करते. राज्यातंर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पीकस्पर्धा घेण्यात येते.
सन २०२५-२६ साठी विविध कृषी पुरस्कार व पीकस्पर्धा योजनेअंतर्गत ८ कोटींची अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे. तर रब्बी हंगाम २०२४ मधील, एकूण १००७ पीकस्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांना बक्षीस रक्कम अदा करण्याकरिता कृषी,पशु संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या १३ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार कृषी आयुक्तालयास ५७ लाख २० हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
तीन स्तरीय पुरस्कार
नागपूर विभागातील शेतकऱ्यांपैकी ११५ शेतकऱ्यांची निवड तीन स्तरांवरील पुरस्कारांसाठी करण्यात आली. यानुसार तीन शेतकऱ्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली असून बक्षिसापोटी १ लाख २० हजारांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.
जिल्हा स्तरीय पुरस्कारासाठी ३८ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून बक्षिसापोटी २ लाख ८९ हजारांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. तर ७४ शेतकऱ्यांची तालुकास्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली असून बक्षिसापोटी २ लाख ९१ हजारांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे.