मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपच्या दबावात स्वत:चीच प्रभाग रचना बदलली, नितीन राऊतांनी साधला नेम
By कमलेश वानखेडे | Updated: August 4, 2022 18:21 IST2022-08-04T18:14:27+5:302022-08-04T18:21:09+5:30
शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून निर्णय घेतले जात असल्याचा आरोप

मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपच्या दबावात स्वत:चीच प्रभाग रचना बदलली, नितीन राऊतांनी साधला नेम
नागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेचा निर्णय घेण्यात आला होता. आता तेच शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर भाजपच्या दबावाखाली स्वत:चाच निर्णय बदलत आहेत, अशी टीका माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग रचनेत भाजपला आपला पराभव दिसत होता. त्यामुळे शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून निर्णय बदलण्यात आला, असा आरोपही राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे महत्वाचे मंत्री होते. मंत्रीमंडळात प्रभाग रचनेचा मुद्दा आला त्यावेळी आपण तीन व चार सदस्सीय प्रभाग रचनेला विरोध केला होता. मात्र, त्यावेळी शिंदे यांनीच महापालिकेत तीन सदस्यीय प्रभाग रचनेला संमती दिली. आज ते स्वत:चाच निर्णय बदलवित आहेत. हे विलक्षण आहे. कुठेतरी भाजपच्या दबावात ते काम करीत आहेत, असे राऊत म्हणाले.
चार सदस्यीय प्रभाग लोकांना नकोच आहे. यात खऱ्या अर्थाने विकास कामे होत नाहीत. एकमेकांवर कामे ढकलली जातात. जनतेचा फुटबॉल होतो. लोक नगरसेवकांनी करावयाची कामे आमदारांकरडे घेऊन जातात. त्यामुळे आमदारांवरील ताण वाढतो, असेही राऊत म्हणाले.