"देशाचे पंतप्रधान कसे होता होईल यातच रस" सपकाळ फडणवीसांवर बरसले, कुचकामी गृहमंत्री असल्याची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:02 IST2025-10-28T15:58:24+5:302025-10-28T16:02:34+5:30
Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुचकामी गृहमंत्री ठरले आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात संतप्त घटना घडत आहेत. फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी खोक्या, आका, कोयता गँग यांसारखे शब्द दिले.

"His only interest is in how to be country's Prime Minister" Sapkal lashed out at Fadnavis, criticizing him for being an ineffective Home Minister
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कुचकामी गृहमंत्री ठरले आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रात संतप्त घटना घडत आहेत. फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी खोक्या, आका, कोयता गँग यांसारखे शब्द दिले. याला पूर्णपणे फडणवीस जबाबदार आहेत. महाराष्ट्राला किमान पूर्ण वेळ गृहमंत्री द्यावा. त्यांना स्वतःला गडचिरोलीच्या खाणी कोणाला वितरित करायच्या आणि देशाचे पंतप्रधान कसे होता होईल यातच रस असून, त्यासाठी खटाटोप सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. सोमवारी पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले, निवडणूक आयोग मतचोरी करतोय, राहुल गांधी यांनी देशभरात कॅम्पेन सुरू केल्यानंतर त्याचे विविध पुरावे सादर केलेले आहेत. 'गली गली मे चोर है, चुनाव आयोग चोर है,' हे लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचले आहे. त्यामुळे भाजप घाबरली आहे, असे सपकाळ म्हणाले.
मोहोळ यांचा राजीनामा घ्या
जैन बोर्डिंगचा व्यवहार केवळ रद्द करून चालणार नाही, साडेतीन एकर जमीन गिळंकृत करणारे मुरलीधर मोहोळ होते. त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. आज नाही तर उद्या हा व्यवहार रद्द झालाच असता. आता मोहोळ यांना वाचविण्याकरिता हा करार रद्द करण्याचा खटाटोप चालला आहे, असेही सपकाळ म्हणाले.
बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा
बच्चू कडू यापूर्वी उपोषणाला बसले होते. सरकारने त्यांच्या सर्व मागण्या आणि प्रश्न ताबडतोब सोडविले पाहिजे, अशी भूमिका आम्ही जाहीर केली आहे. बच्चू कडू यांनी आपल्यालाही पाठिंब्यासाठी पत्र पाठविले आहे. काँग्रेसचा त्यांना पाठिंबा आहे, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.
शेतकरी पॅकेजमध्ये लिकेज
पॅकेजमधून शेतकऱ्यांना काही मिळणार नाही. या पॅकेजमध्ये अनेक लिकेजेस आहेत. मुख्यमंत्र्यांनी कुठलीही कमाल मर्यादा न ठेवता हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी, सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.