शेतकऱ्यांची होणार पीकस्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST2020-12-02T04:09:26+5:302020-12-02T04:09:26+5:30

कळमेश्वर : रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी कळमेश्वर तालुका कृषी विभागाच्यावतीने पीकस्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजयी ...

Farmers will have crop competition | शेतकऱ्यांची होणार पीकस्पर्धा

शेतकऱ्यांची होणार पीकस्पर्धा

कळमेश्वर : रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी कळमेश्वर तालुका कृषी विभागाच्यावतीने पीकस्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजयी शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा, राज्य व विभागस्तरावर पुरस्कार प्रदान करण्यात येतील अशी माहिती तालुका कृषी अधिकारी उमाकांत हातांगळे यांनी दिली. कृषी विभागाकडून नागपूर जिल्ह्यात रबी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पीक स्पर्धाचे निकष बदलण्यात आले आहे. तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य पिकांच्या जिल्हांतर्गत पीक स्पर्धेचे आधीचे नियम, वेळापत्रक आणि बक्षीस रक्कम देखील बदलण्यात आलेली आहे. यंदाच्या रबी हंगामापासून नव्या निकषाची अंमलबजावणी होईल. त्यासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत शेतकरी अर्ज करू शकतात.

ज्वारी, गहू, हरबरा, जवस, तूर अशा पाच पिकासाठी रबी पीकस्पर्धा होईल. यासाठी शेतकऱ्यांना किमान १० आर क्षेत्रावर सलग लागवड करावी लागेल. पीक स्पर्धेतील पिकाची निवड करताना पिकनिहाय तालुक्यातील क्षेत्र किमान १००० हेक्टर असणे गरजेचे आहे.

तालुका स्तरावर सर्वसाधारण गटासाठी १० व आदिवासी गटात ५ कमीत कमी अर्ज येणे आवश्यक आहे. संबंधित गावात त्यासाठी पीक कापणी समिती नेमली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पीकनिहाय उत्पादकता तालुक्याच्या सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा १.५ पट किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येईल. त्यांच्यामधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येतील. त्यापेक्षा कमी उत्पादन असणारे शेतकरी सर्व पातळीवरील पीकस्पर्धा पुरस्करासाठी अपात्र समजण्यात येतील.

गावपातळीवर पीक कापणी समिती

पीककापणी समितीत पर्यवेक्षक अधिकारी (अध्यक्ष), कृषी सहायक ( सदस्य सचिव), लाभार्थी शेतकरी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतिशील शेतकरी, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांचा समावेश राहणार आहे.

असे आहेत पुरस्कार

राज्यस्तरावरील स्पर्धेचे निकाल कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती घोषित करेल. जिल्हा स्तरावर पहिला पुरस्कार १० हजार रुपये, दुसरा ७ हजार तर तिसरा पुरस्कार ५ हजार रुपये रोख असा आहे. विभागीय स्तरावर पहिला पुरस्कार २५ हजार, दुसरा २० हजार तर तिसरा पुरस्कार १५ हजार रुपयांचा असेल. तालुका कृषी अधिकाऱ्याकडे संबंधित स्पर्धेसाठी अर्ज करावयाचा आहे. ३०० रुपये स्पर्धा प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

Web Title: Farmers will have crop competition