निधी अभावी दहा महिन्यांपासून सीसीटीव्ही प्रकल्प प्रतीक्षेत; नागपूर जिल्ह्यातील ४५० शाळांचा प्रस्ताव अडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:26 IST2025-06-11T19:25:04+5:302025-06-11T19:26:29+5:30
Nagpur : ४५० जि. प. शाळांचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी पुण्याला अडकलेला

CCTV project pending for ten months due to lack of funds; Proposal for 450 schools in Nagpur district stuck
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पालघर-ठाणे जिल्ह्यातील शाळेत घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला, निधीअभावी व प्रशासकीय प्रक्रियेमुळे नागपूर जिल्ह्यातील जि. प.च्या ४५० शाळांचा प्रस्ताव गेल्या दहा महिन्यांपासून पुणे कार्यालयात मान्यतेसाठी अडकल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता
या कॅमेरांमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा, शिस्तबद्धता, मालमत्तेचे संरक्षण आणि गैरप्रकारांवर नियंत्रण हे उद्दिष्ट होते. पण, प्रकल्प रखडल्याने या उद्दिष्टांवर पाणी फिरले आहे. पालक वर्गातूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
१५१२ पैकी ४५० शाळांनाच सीसीटीव्ही
जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे, अशा ४५० शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी ४ कोटी ७ लाख रुपयांचा खर्च मंजूर झाला असून, जिल्हा नियोजन निधीतून तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीला विलंब होत आहे. जि. प.च्या १५१२ शाळांपैकी ४५० शाळांतच हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
मुख्य मुद्दे
- ४५० शाळांसाठी सीसीटीव्ही प्रस्ताव १० महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत
- ४ कोटी ७ लाख रुपयांची तरतूद असूनही अंमलबजावणीला विलंब
- चोरी व अनुशासनाच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रकल्प गरजेचा
- पालक आणि शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता
चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष
- २७ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे, आणि त्याआधीच काही शाळांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत.
- ११ ते १६ मे दरम्यान काटोल शहरातील जिल्हा परिषद शाळेतील संगणक, वायरिंग, टेबल, टीव्ही इत्यादी साहित्य चोरीला गेले.
- यानंतर संबंधित ३ मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करून सीसीटीव्हीची मागणी केली होती.