फार्म हाउसवरील धाड हे कुंभारे यांचे षड्यंत्र ? बावनकुळे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे अजय अग्रवाल यांचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:41 IST2025-12-04T18:39:53+5:302025-12-04T18:41:33+5:30
Nagpur : भाजपचे कामठीत मजबूत पक्षसंघटन आहे. त्यामुळे भाजपने येथे स्वबळावर निवडणूक लढविली. यात आमचा विजयही होईल असा विश्वास अग्रवाल यांच्यासह भाजपचे जिल्हा महामंत्री अनिल निधान यांनी पत्रपरिषदेत दरम्यान केला.

Ajay Agarwal's serious allegations that the raid on the farmhouse was a conspiracy by Kumbhare? An attempt to defame Bawankule
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी-नागपूर मार्गावर असलेल्या सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाउसवर मंगळवारी निवडणूक विभाग व पोलिसांनी टाकलेली धाड ही बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या अॅड. सुलेखा कुंभारे यांनी रचलेले षड्यंत्र आहे. सुनील अग्रवालचा भाजपशी कोणताही संबंध नाही. कुंभारे यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बदनामी करण्यासाठी काँग्रेससोबत मिळून हा प्रकार घडवून आणल्याचा गंभीर आरोप भाजपचे कामठीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय अग्रवाल यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला आहे.
मंगळवारी कामठी नगर परिषद निवडणुकीदरम्यान नागपूर-कामठी मार्गावरील उद्योजक सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाउसवर धाड टाकत पोलिस व निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने दारूच्या बाटल्या ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल, बोटावरील शाई मिटविण्याचे लिक्विड (द्रव) यासह ९ पुरुष आणि ३ महिलांना ताब्यात घेतले होते. निवडणूक विभागाने जप्त केलेले साहित्य व ताब्यात घेतलेल्या लोकांशी भाजपचा काही एक संबंध नाही. हे कुंभारे आणि काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शकूर नागाणी यांनी घडवून आणले आहे. त्यांनीच तिथे लोक आणि उपरोक्त साहित्य आणल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला.
भाजपचे कामठीत मजबूत पक्षसंघटन आहे. त्यामुळे भाजपने येथे स्वबळावर निवडणूक लढविली. यात आमचा विजयही होईल असा विश्वास अग्रवाल यांच्यासह भाजपचे जिल्हा महामंत्री अनिल निधान यांनी पत्रपरिषदेत दरम्यान केला.
युती केली नाही म्हणून
कालपरवापर्यंत बावनकुळे यांच्या विकासकामांचा पाढा वाचणाऱ्या कुंभारे यांच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी भाजपने संधी दिली नाही. यासोबतच आम्ही नगर परिषदेत 'बरिएमं'सोबत युती केली नसल्याने कुंभारे भाजप आणि बावनकुळे यांच्यावर चुकीचे आरोप लावत आहेत. भाजपने त्यांना युतीचा प्रस्तावही दिला होता. तो त्यांनी स्वीकारला नाही.