'खर्रा कॅपिटल' नंतर नागपूरचा नवा रेकॉर्ड; देशात सर्वाधिक अश्लील शेरेबाजी करणाऱ्यांचे शहर ! एनसीआरबीचे धक्कादायक आकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:57 IST2025-10-16T14:43:14+5:302025-10-16T14:57:58+5:30
Nagpur : देशभरात कलम २९४ अंतर्गत एकूण १,०६३ प्रकरणे नोंदली गेली, त्यापैकी जवळपास अर्धी नागपूरमध्येच आहेत. तुलनेने, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंदूरमध्ये अशा फक्त १३४ नागपूरची या तुलनेत चार पट जास्त आहेत.

After 'Kharra Capital', Nagpur sets new record; City with most obscene remarks in the country! NCRB's shocking figures
नागपूर :नागपूर केवळ संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेलं शहर नाही हे आपल्याला शहराचे खर्रा कॅपिटल म्हणून नवीन नामोल्लेख झाल्यापासून समजलंच असेल पण त्यात भर घालायला नागपूर आता वेगळ्याच कारणासाठी 'कुप्रसिद्ध' होत आहे आणि ते म्हणजे अश्लील कृत्ये, अश्लील शेरेबाजी, शिवीगाळ व अश्लील गाणी म्हणणे यासंबंधी नागपूर देशात अव्वल ठरले. भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ अंतर्गत म्हणजेच “सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द किंवा कृती” या गुन्ह्यांत नागपूरने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) आकड्यांनुसार २०२३ मध्ये एकूण ५६१ गुन्हे या कलमान्वये नागपूरमध्ये नोंदवले गेले, जे देशातील कोणत्याही शहरापेक्षा सर्वाधिक आहेत.
देशभरात कलम २९४ अंतर्गत एकूण १,०६३ प्रकरणे नोंदली गेली, त्यापैकी जवळपास अर्धी नागपूरमध्येच आहेत. तुलनेने, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंदूरमध्ये अशा फक्त १३४ नागपूरची या तुलनेत चार पट जास्त आहेत, आणि मुंबईत ४८ प्रकरणे नोंदली गेली. ही तफावत इतका मोठा आहे की नागपूरच्या या “रेकॉर्ड”कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिस आणि कायदा काय म्हणतो?
पोलिसांच्या मते, प्रत्येक चिडवणं किंवा टोमणा हा गुन्हा ठरत नाही. तो सार्वजनिक ठिकाणी आणि एखाद्याच्या मनःस्तापाला कारणीभूत झाला तर तो गुन्हा ठरतो. भादंवि कलम २९४ (आता कलम २९६) नुसार, अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास, दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तथापि, न्यायालयात “या वक्तव्यामुळे खरंच कोणाला त्रास झाला का” हे सिद्ध करणे कठीण ठरते, असे पोलिसांनी मान्य केले आहे
समाजासाठी इशारा की आरसा?
या आकड्यांकडे फक्त गुन्हेगारीच्या दृष्टीने न पाहता, सामाजिक वर्तणुकीचा आरसा म्हणून पाहण्याची गरज आहे. शब्दांची ताकद अमर्याद असते, पण ती जबाबदारीने वापरणे तितकेच महत्त्वाचे आहे. शहरातील नागरिकांनी सभ्यता आणि सार्वजनिक शिष्टाचार जपले, तर नागपूर पुन्हा “संत्रानगरी” या नावानेच ओळखले जाईल, “अश्लील टिप्पणींचे केंद्र” म्हणून नाही.