५ महिन्यात ७२९.१५ कोटी
By Admin | Updated: September 2, 2016 02:55 IST2016-09-02T02:55:45+5:302016-09-02T02:55:45+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास झपाट्याने होत असतांना नागपूर जिल्हा आणि शहराचा विकासही तेवढ्याच झपाट्याने होत आहे

५ महिन्यात ७२९.१५ कोटी
पालकमंत्री बावनकुळे : मुख्यमंत्री फडणवीस व गडकरी यांच्यामुळेच केंद्र-राज्याकडून निधी उपलब्ध
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास झपाट्याने होत असतांना नागपूर जिल्हा आणि शहराचा विकासही तेवढ्याच झपाट्याने होत आहे. देशाच्या विकासासोबतच जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे या जिल्ह्यात विकास गंगा वाहून विकासाला वेगळी दिशा मिळाली. केंद्र व राज्य शासनाकडून नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाठी ७२९.१५ कोटी रुपयांचा निधी गेल्या ५ महिन्यात विविध विकास कामांसाठी या जिल्ह्याला मिळाला असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मागील १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून नागपूर जिल्ह्यात विकास कामांचा मोठा बॅकलॉग होता. या जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष देण्यात आले नाही. जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला नाही. त्या तुलनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील आणि शहरातील विविध विकास कामांसाठी प्रचंड निधीची व्यवस्था करून दिली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबंधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांची अनेक कामे नागपूर जिल्ह्यातच नव्हे विदर्भातही रस्त्यांचे जाळे विणले आहे. नागपूरच्या या दोन विकास पुरुषांनी एकत्रपणे मिहानला चालना दिली. एम्स, आयआयआयटी, नॅशनल लॉ स्कूल, आयआयएम, सेंट्रल पॉवर इन्स्टिट्यूट, पतंजली फूड पार्क असे मोठे प्रकल्प आणले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेला वेग दिला. मेट्रो रेल्वे, मेट्रो रिजन आराखडा या प्रकल्पांना मुख्यमंत्री फडणवीस व नितीन गडकरी यांच्यामुळे वेग मिळाला आहे. शहर आणि जिल्ह्यात प्रचंड विकास कामे सुरू आहेत, याचा लोकांना अनुभव येत आहे.
नागपूर शहराची जिल्हा नियोजन समिती ही दोन वर्षात ३५० कोटींची झाली. या समितीला एवढा निधी कधीच मिळाला नाही. केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच हा निधी उपलब्ध झाला. या निधीशिवाय अन्य योजनांसाठी कोट्यवधींचा निधी या दोन विकास पुरुषांनी नागपूरला उपलब्ध करून दिला आहे.
तसेच शहरातील व जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या सहकार्यामुळे आणि सकारात्मक भूमिकेमुळे जिल्ह्याच्या व शहराच्या विकासाला चालना मिळाली आहे. शहरातील आमदार सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. प्रा. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. गिरीश व्यास, आ. नागो गाणार, जिल्ह्यातील आ. आशिष देशमुख, आ. सुधीर पारवे, आ. समीर मेघे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी हे सर्व आमदार विकास कामांसाठी निधी खेचून आणून आपल्या मतदार संघात विकास कामे करुन राज्याचा विकासाचा वेग वाढवण्यास मदत करीत आहेत, याकडे पालकमंत्री बावनकुळे यांनी लक्ष वेधले.
जिल्ह्याला नुकतेच १४.५० कोटींचे विशेष व वैशिष्ट्यपूर्ण अनुदान मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजूर केले. तसेच १२ नगर परिषदा व ५ नगर पंचायतींना १८ कोटी शासनाने मंजूर केले. जिल्ह्यातील या आमदारांच्या सहकार्यानेच हे अनुदान मंजूर होऊ शकले, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले. (प्रतिनिधी)