भोंगापतींमुळे हिंदू भाविकांचे सर्वात मोठे नुकसान झाले; जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 15:56 IST2022-05-12T15:56:39+5:302022-05-12T15:56:50+5:30

मीरा रोड : गेल्या काही दिवसांत भोंगा नावाने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला; पण महाराष्ट्राच्या जनतेने भोंग्याचा पोंगा करून ...

Minister and NCP leader Jitendra Awhad has criticized MNS chief Raj Thackeray | भोंगापतींमुळे हिंदू भाविकांचे सर्वात मोठे नुकसान झाले; जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका

भोंगापतींमुळे हिंदू भाविकांचे सर्वात मोठे नुकसान झाले; जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंवर टीका

मीरा रोड : गेल्या काही दिवसांत भोंगा नावाने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाला; पण महाराष्ट्राच्या जनतेने भोंग्याचा पोंगा करून टाकला. मराठीत उचापती म्हणतात तसेच हे भोंगापती, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली; परंतु या भोंगपतींमुळे सर्वात मोठे नुकसान हिंदू भाविकांचे झाल्याचे ते म्हणाले.

मीरा रोडच्या मेडतीया मैदानात रविवारी आयोजित पक्षाच्या मेळाव्यात आव्हाड बोलत होते. कोरोनाकाळात कोणी उपचार केले, कोणी रक्त दिले, कोणी सेवा केली माहिती नाही. कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर प्रेताच्या जवळ जायला लोक घाबरायचे. त्यावेळी मृतदेह कोणी उचलले व अंत्यविधी कोणी केले, त्यांचे धर्म कोणते याचा विचार त्यावेळी कोणी केला नाही. केवळ माणुसकी दिसत होती; पण कोरोना गेला आणि नेत्यांना पुन्हा धर्म-जात आठवायला सुरुवात झाली, असे आव्हाड म्हणाले. यावेळी प्रदेश सचिव मोहन पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, साजिद पटेल, अनु पाटील आदी उपस्थित होते.

कर्ण्यावरून होणारी आरती झाली बंद

भोंगा या विषयामुळे सर्वात मोठी अडचण श्रद्धाळू हिंदूंची झाली. कारण शिर्डीची शेजारती- काकड आरती कर्ण्यावरून व्हायची बंद झाली. पंढरपूरची विठ्ठल-रखुमाईची, तुळजापूरची आरती तशीच बंद झाली. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर उभे राहून कर्ण्यावरून ऐकू येणारी आरती भाविक करायचे. मुस्लिमांनी निर्णय घेत दीड मिनिटांची अजान भोंग्यावरून बंद केली, याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले. स्वतःच खणलेल्या खड्ड्यात माणूस कसा पडतो त्याचे उद्दाम उदाहरण भोंगापती आहे, असा टोला आव्हाड यांनी लगावला.

Web Title: Minister and NCP leader Jitendra Awhad has criticized MNS chief Raj Thackeray