नरेंदर भाईंची(च) आयडियाची कल्पना, निवडणुकीसाठी साद घातली जगाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 05:48 PM2019-04-29T17:48:20+5:302019-04-29T17:50:31+5:30

जगातल्या पर्यटकांना भारतीय निवडणुकीच्या गरमागरम रणकंदनात उतरवण्याची आयडिया जन्माला आली ती गुजरातमध्ये! ते कसं झालं?

Narendra Modi idea of election tourism in Gujarat Election 2012 | नरेंदर भाईंची(च) आयडियाची कल्पना, निवडणुकीसाठी साद घातली जगाला!

नरेंदर भाईंची(च) आयडियाची कल्पना, निवडणुकीसाठी साद घातली जगाला!

Next
ठळक मुद्देभारतात निवडणूक पर्यटनाचं आगमन झालं तेच मुळी नरेंद्र मोदींच्या पाठिंब्यानं. मोदींना आधी ‘भारतीय नेतृत्व’ म्हणून आणि नंतर ‘जागतिक नेता’ म्हणून उदयास यायचं होतं. पहिल्याच प्रयत्नात तीनशे परदेशी नागरिक गुजरातची निवडणूक अनुभवण्यासाठी आले. 

- सुकृत करंदीकर

निवडणूक पर्यटन भारतात येऊन पोहोचलं, ते एका दूरदृष्टीच्या राजकीय नियोजनाचा भाग म्हणून. ‘नरेंद्र मोदी’ यांच्याबद्दल कोणाला काय वाटतं, याची चर्चा मला इथं करायची नाही; परंतु राजकीय आडाखे कसे आखले जातात, प्रतिमानिर्मिती कशी केली जाते, एखाद्या नेत्याभोवतीचं वलय कसं विस्तारत जातं या सर्वांचा एक भाग म्हणून निवडणूक पर्यटन आणि नरेंद्र मोदी यांच्याकडं पाहायला हवं. त्याचं कारण असं की, भारतात निवडणूक पर्यटनाचं आगमन झालं तेच मुळी नरेंद्र मोदींच्या पाठिंब्यानं आणि त्यांच्याच गुजरातमध्ये. आवर्जून लक्षात घेण्याची बाब म्हणजे हे ज्या वर्षी घडलं त्या सन 2012 मध्ये नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील हे ना भारताला माहिती होतं, ना भाजपला, ना जगाला. पण मोदींची स्वत:ची तयारी मात्र त्याच दिशेनं चालली होती, हे आता ठामपणानं सांगता येतं. त्या दिशेनं त्यांनी अनेक मार्गांनी प्रयत्न चालवले होते. अगदी कुठलीही छोटी-मोठी गोष्ट कमी पडू नये, याची काळजी त्यांनी घेतली होती. मोदींना आधी ‘भारतीय नेतृत्व’ म्हणून आणि नंतर ‘जागतिक नेता’ म्हणून उदयास यायचं होतं. 

निवडणुकीचा थरार देशभर असतो. पण हा थरार पाहण्यासाठी लोक जमवले पाहिजेत, तेही अमेरिका, इंग्लंडमधून आले तर आणखीन बरं, या विचाराला कोण्या नेत्यानं थारा दिलेला नव्हता. नरेंद्र मोदींनाही स्वत:ला हे सगळं सुचलं असं नव्हे; पण त्यांच्यापर्यंत जेव्हा हे सगळं पोहोचलं तेव्हा या चलाख गुजराथी नेत्याला या ‘आयडिया’तली ताकद समजण्यास वेळ लागला नाही. 

पर्यटन कंपनी चालवणार्‍या मनीष शर्मा नावाच्या गुजराथी कलंदराच्या मनात मेक्सिकोतल्या ‘पोल टुरिझम’ची संकल्पना रुतून बसली होती. लंडनच्या जागतिक पर्यटनविषयक प्रदर्शनात त्यानं ती अधिक विस्तारानं मांडली. अर्थातच भारताच्या संदर्भानं. त्या प्रदर्शनात त्याचं स्वागत झालं. इंग्लंडमधल्या गुजराथी समुदायाची संख्या लक्षणीय आहे. हे शर्माजी ‘इलेक्शन टुरिझम’ही संकल्पना घेऊन थेट पोहोचले गांधीनगर-अहमदाबादेत. वर्ष होतं 2012. गुजरात विधानसभेची निवडणूक तोंडावर होती. हे शर्माजी ‘नरेंदर भाईं’कडे गेले. मोदींनी या संकल्पनेला नुसतं उचलूनच धरलं नाही तर त्याला पूर्ण पाठिंबा दिला. शर्मांच्या कंपनीनं इंग्लंड-अमेरिकेत गुजरात निवडणूक पर्यटनाची आयडिया सहज विकली. पहिल्याच प्रयत्नात तीनशे परदेशी नागरिक गुजरातची निवडणूक अनुभवण्यासाठी आले. 

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून तिसर्‍यांदा विजयी होण्यासाठी निवडणूक लढणार्‍या नरेंद्र मोदींनी या परदेशी मंडळींना आवर्जून वेळ दिला. या पर्यटकांसोबत त्यांनी बैठक घेतली. ‘फोटो सेशन’ झालं. एवढंच नव्हे तर मोदींच्या प्रचार सभा आणि मिरवणुकांमध्ये या परदेशी पर्यटकांना फिरवण्यात आलं. बाकी गिरचे सिंह, गुजराती ढोकला, गांधी आर्शम वगैरे पारंपरिक पर्यटनही झालंच या परदेशी मंडळींचं; पण इंग्लंड-अमेरिकेत परत जाताना ही मंडळी ‘नरेंदर भाईं’ची प्रतिमा डोक्यात घेऊन गेले. मोदींचा कामाचा झपाटा, पाहुण्यांचा केलेला आदर, त्यावेळच्या गुजरातमध्ये हिमालयावर जाऊन पोहोचलेली त्यांची अफाट लोकप्रियता हेच चित्र साठवून परदेशी पर्यटक परतले होते. त्यांच्या दृष्टीने ‘इनक्रेडिबल इंडिया’तल्या अनोख्या निवडणुकीचा अनुभव त्यांच्या गाठी जमा झाला होता आणि भारतातल्या ‘रॉकस्टार नेत्या’शीही जवळीक साधता आली होती. मनीष शर्मांचा धंदा झाला, डॉलर्समध्ये पैसे मिळाले. नरेंद्र मोदींनी त्यांचे गुणगान गाणारे तीनशे परदेशी नागरिक अवघ्या काही मिनिटांच्या बेगमीतून मिळवले होते. परदेशात मोदींच्या ‘प्रतिमे’चं ब्रँडिंग करण्यासाठी हीच पर्यटक मंडळी पुढे स्वत:हून कंठशोष करणार होती. 

सन 2012 मधल्या पहिल्याच यशस्वी अनुभवानंतर मनीष शर्मांंचा आत्मविश्वास दुणावला होता. सन 2014 च्या राष्ट्रीय निवडणुकीत हीच संकल्पना त्यांनी आणखी विस्तारानं राबवली. त्याही वेळी ‘नरेंदर भाई’ त्यांच्या मदतीला होतेच. तीनशे पर्यटकांची संख्या आता अनेक पटींनी वाढून तो आकडा पाच हजारांच्याही पुढे गेला. हे सगळे लोक इंग्लंड, अमेरिका आणि युरोपातल्या श्रीमंत देशांमधले होते, हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. चीन, नेपाळ, दुबई, अबुधाबी, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांमधलेही होते. 

मनीष शर्मांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, ‘‘हे परदेशी पर्यटक बहुसंख्येनं तरुण आणि चाळिशीच्या आतले होते. त्यात सर्वसामान्य पर्यटक होतेच. शिवाय, भारताचा अभ्यास करणारे विद्यार्थी, पत्रकार होते. संशोधक, विद्यापीठांमधले प्राध्यापक, महिला संस्थांचे प्रतिनिधी, इतिहास अभ्यासक असेही लोक त्यात होते. निवडणूक पर्यटनाचा भाग म्हणून आम्ही त्यांना गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, दिल्ली या राज्यांमध्ये घेऊन गेलो होतो. प्रचार सभांमध्ये त्यांना फिरवलं. विविध पक्षांच्या राष्ट्रीय-प्रादेशिक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.’’

कोणते पक्ष आणि कोणते नेते, असा प्रश्न केल्यावर आलेल्या उत्तरात बहुसंख्य नेते भाजपचे होते. त्यातही ‘अमितभाई’ आणि ‘नरेंदरभाई’ यांची नावं प्रामुख्यानं आली. मुलायमसिंह, अरविंद केजरीवाल, अखिलेशसिंग यांचाही उल्लेख झाला. सन 2014 मध्येही परदेशी नागरिकांचं निवडणूक पर्यटन झोकात साजरं झालं होतं. गुजरात विधानसभा (2012) आणि लोकसभा निवडणूक (2014) च्या यशानंतर आता यंदा पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती आणखी विस्तारित स्वरुपात होते आहे. म्हणजे मध्य भारतापुरतं र्मयादित न राहाता देशाच्या सर्व भागात निवडणूक पर्यटनाच्या सफरी आखण्यात आल्या आहेत. त्या-त्या राज्यांमधली निसर्गस्थळं, जंगलं, गिर्यारोहण, समुद्रकिनारे, मंदिरे-लेणी, निसर्गोपचार, वाळवंट आदी वैशिष्ट्यांची जोड देऊन दौर्‍यांची आखणी झालेली आहे. दहा-दहा दिवसांच्या पंधराशे डॉलर्सपर्यंतच्या या सफरींना मिळालेला प्रतिसादही जोरदार आहे. तारांकित हॉटेलांमधला सुरक्षित निवास, दर्जेदार भोजन, ‘हॉट इंडियन समर’ डोळ्यापुढं ठेवून दिलेल्या खास सुविधा अशी रेलचेल या ‘पॅकेज’मध्ये आहे. 

अमेरिकन पर्यटक म्हणतात, भारतीय मतदार फार स्मार्ट!

मूळचे भारतीय; पण चाळीस वर्षांपूर्वी अटलांटा इथं स्थायिक झालेले वासुदेव पटेल व्यवसायानं डॉक्टर आहेत. ते 10 एप्रिलला भारतात आले ते फक्त निवडणूक पाहण्यासाठी. भारतासाठी ही सर्वात महत्त्वाची निवडणूक असल्याचं त्यांना वाटतं. वीस दिवसांच्या भारत दौर्‍यावर आलेल्या पटेल यांच्या गटात 12 परदेशी नागरिक आहेत. त्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा या देशातले हे लोक आहेत. 

या अनुभवाबद्दल बोलताना पटेल सांगत होते, ‘‘आतापर्यंत आम्ही गुजरात आणि मध्य प्रदेशचे दौरे केले. हा अनुभव वेगळा होता. चार दशकांपूर्वीच्या मी पाहिलेल्या निवडणुका खूप साध्या होत्या. आता इतकी गर्दी, मीडियाचा प्रभाव, कॅमेर्‍यांचा चकचकाट असलं काहीच नव्हतं. अटलांटातल्या निवडणुका तर कधी आल्या आणि कधी गेल्या हेही समजत नाही. ईमेल, फोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला जातो. टाउन हॉलमध्ये मीटिंग होतात. भारतासारख्या प्रचारसभा, फेर्‍या असं नसतं. अगदी स्थानिक निवडणूक असेल तरच अपॉइंटमेंट घेऊन राजकीय पक्षांचे प्रतिनिधी भेटायला येतात. तरी मी तिथे सामाजिक कार्याचा भाग आहे. गुजराती समाज मंडळाचा अध्यक्ष होतो. जॉजिर्या स्टेटच्या इंडियन असोसिएशनचा अध्यक्ष होतो. तरीही तिथल्या निवडणुकांमध्ये भारतात राबवली जाणारी प्रचार यंत्रणा कधी पाहिली नाही.’’ 

भारतीय मतदार मात्र खूप ‘स्मार्ट’ असल्याचं निरीक्षण डॉ. वासुदेव नोंदवतात. ‘‘समोरच्याचा अंदाज घेत तो बोलतो. त्याच्या मनातलं ओळखणं खूप अवघड आहे,’’ असा अनुभव पटेलांनी सांगितला. 

ते म्हणाले, ‘‘मी आता अमेरिकी झाल्यानं माझ्या गटातल्या परदेशी लोकांचा दुभाषी म्हणूनच काम करतो आहे. निवडणुकीत होणारी व्यक्तिगत टीका आणि प्रचारातले मुद्दे या दोन कारणांमुळं या लोकांना बर्‍याचदा आश्चर्याचे धक्के बसतात, असं मला जाणवतं. पारंपरिक पर्यटनासोबतच ‘इंडियन टेस्टी फुड’ आणि ‘साइट सिइंग’चा मात्र ते पुरता आनंद लुटत आहेत.’’
 

Web Title: Narendra Modi idea of election tourism in Gujarat Election 2012

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.