सुनीताबाई देशपांडे- गृहिणी-सखी-सचिव..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 06:00 AM2019-11-03T06:00:00+5:302019-11-03T06:00:04+5:30

पु.लं. ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणार असताना त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. पुलं आणि सुनीताबाई दोघांचीही पुस्तकं एका अगदी छोटेखानी घरगुती कार्यक्रमात  प्रकाशित करण्यात आली. आयुष्यभर पुलंशी बरोबरीच्या नात्यानं वागणार्‍या सुनीताबाई. त्या दिवशी एक अनोखी घटना घडली. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून त्या म्हणाल्या -  ‘जी गोष्ट आजपर्यंत कधीही घडलेली नाही अशी एक कृती  मी आज आत्ता करणार आहे. मी भाईला नमस्कार करते.’ मिश्कील पुलंनीही ‘पुरावा हवा’ म्हणून सुनीताबाईंना ‘रिटेक’ करायला लावून मला तो फोटो काढायला सांगितला ! आजही त्या आठवणींनी डोळ्यांच्या कडा पाणावतात..

The great memories of Sunitabai Deshpande and P. L. Deshpande by Sateesh Paknikar | सुनीताबाई देशपांडे- गृहिणी-सखी-सचिव..

सुनीताबाई देशपांडे- गृहिणी-सखी-सचिव..

Next
ठळक मुद्देदि. 7 नोव्हेंबर ही सुनीताबाई देशपांडे यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त.

- सतीश पाकणीकर

‘काssय हो? काय म्हणताय?’ असा परिचित आवाज मला माझ्या नव्या लॅण्डलाइनच्या रिसिव्हरमधून ऐकू आला आणि मला एकदम हुश्श झाले. म्हणजे ते दोघेही पुण्यातल्या त्यांच्या घरीच होते. मी पुण्यातच, गावातून कोथरूडला राहायला आलो होतो. माझ्याकडे नुकताच दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दूरध्वनी आला होता. आणि चक्क सुरूही झाला होता. मोबाइलचा जमाना इथे सुरू व्हायचा होता अन लॅण्डलाइनला अजून महत्त्व होते. पहिलाच कॉल कोणाला करायचा तर तो मी 1, रूपाली 777, शिवाजीनगर, पुणे येथे केला होता. अर्थातच सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पुलंच्या घरी. त्यांच्या 334628 या नंबरवर. दिवस होता 14 ऑगस्ट 1996. पलीकडून सौ. सुनीताबाई देशपांडे बोलत होत्या. त्यांचा नेहमीच बोलताना येणारा ‘काssय हो’चा आवाज मी झोपेतून उठवलो तरी त्यावेळीही सहज ओळखू शकलो असतो. मी त्यांना नवीन फोनबद्दल सांगितल्यावर त्या क्षणी त्या म्हणाल्या, ‘थांबा हं.. मी तुमचा नवीन नंबर डायरीत नोंद करून ठेवते.’ त्यांनी लगेच तशी नोंदही केली आणि मगच रिसिव्हर भाईंच्याकडे सोपवला.
मी साधारण दहावीत असल्यापासून 8 नोव्हेंबरला न चुकता पुलंच्या घरी त्यांना शुभेच्छा द्यायला जात होतो. नंतर शिक्षण संपवून मी औद्योगिक प्रकाशचित्नणाचा व्यवसाय सुरू केला. आवड म्हणून संगीत क्षेत्नातील नामवंतांच्या भावमुद्राही टिपायला सुरुवात केली. माझी ती आवड त्या दोघांच्या नजरेतून सुटती तरच ते नवल. मग मला ते वेगवेगळ्या घरगुती मैफलींची निमंत्नणे आमच्या वाड्यातील हर्डीकर यांच्या फोनवर देत असत. कधी त्यांचे फोटोचे काही काम असे. मी ते त्वरेने करीत असे. त्यामुळे वेळोवेळी मला त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळे. कधी माझ्याजवळ कॅमेराही असे. पण बर्‍याच दिवसांच्या परिचयानंतर मला हे उमगले होते की, पुलंना फोटो काढून घेण्याचे वावडे नव्हते; पण सुनीताबाई मात्न फोटो काढून घ्यायला विरोध करीत. त्यातून त्या दोघांचा फोटो काढलेला त्यांना अजिबात खपत नसे. याचं कारण त्या सर्वसाक्षीलाच माहीत. पण मी मात्न मनाशी ठरवून टाकलं होतं की, ते दोघे असताना, मग ते त्यांच्या घरी असोत की एखाद्या कार्यक्र मात, मी कॅमेरा बॅगमधून बाहेरच काढत नसे. अगदी पुलंच्या जन्मदिनाच्या निमित्तानेही मी तसा फोटो कधी काढला नाही. पण प्रत्येक जन्मदिनी येणार्‍या पाहुण्यांचे अगत्याने स्वागत करणे, त्यांच्या हातावर लगेचच पेढा ठेवणे, कोणी फुले आणली असतील तर तो गुच्छ सोडवून आधी आलेल्या व त्यांनीच सुंदरतेने खोलीत मांडून ठेवलेल्या त्या पुष्परचनांत ती नवी फुले अलगद खोवून ठेवणे, मधेच कोणा महत्त्वाच्या व्यक्तीचा फोन आला तर तो घेऊन उत्सवमूर्तीला आणून देणे, जमलेल्या गप्पांमध्ये एखाद्या घटनेचा संदर्भ तारीख-वार सांगणे व ही सर्व कामे उत्साही आणि हसतमुख चेहर्‍याने करणार्‍या व्यक्तीचे नाव होते सुनीता पुरु षोत्तम देशपांडे.
माझं भाग्य असं की, मी पु.ल. आणि सुनीताबाईंच्या स्नेहशील परिवारातलाच झालो होतो. सुनीताबाई जितक्या स्पष्टवक्त्या, व्यवहारी तेवढय़ाच सहृदय, आतिथ्यशील होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे दोन्ही पैलू मी अनुभवले. साधेपणा हा तर एका वेगळ्याच लेखाचा विषय ठरेल. त्याचा एक अनुभव मला आला. दिनांक 8 नोव्हेंबर 1998. पुल ऐंशीव्या वर्षात पदार्पण करणार होते. लेखकाचा वाढदिवस कसा साजरा व्हावा? त्याच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनाने? हे तर उत्तमच. आणि त्या दिवशी तर पुलंच्या पुस्तकाच्या बरोबरच सुनीताबाईंच्या पुस्तकाचेही प्रकाशन होणार होते. पुलंचे ‘आपुलकी’ हे पुस्तक तर सुनीताबाईंचे ‘सोयरे सकळ’. त्यांच्या मालती-माधव या भांडारकर रोडवरील घराच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये हा छोटेखानी समारंभ होता. त्यावेळी पु.ल. व्हीलचेअरवर होते. दुसर्‍या कोणी व्यक्ती असत्या तर अशा कार्यक्र माला उंची असे कपडे आणि झगमगाट नक्कीच दिसला असता. पण इथे तर उत्सवमूर्तींनी अतिशय साधे कपडे घातले होते. पुल साध्या खादीच्या बंडीत आणि पायांवर शाल पांघरलेले, तर सुनीताबाई जांभळ्या रंगांची फुले असलेली सुती साडी नेसलेल्या. डामडौल नसलेला; पण दोन महनीय व्यक्तींचा असा कार्यक्र म.
सुनीताबाईंचे दोघे बंधू व इतर कुटुंबीय, साक्षेपी संपादक र्शी. पु. भागवत, मधुभाऊ गानू, शांताबाई शेळके, ज्योत्स्नाबाई भोळे, राम गबाले, भक्ती बर्वे अशा काही मंडळींची आवर्जून उपस्थिती आणि या सगळ्यांचे स्वागत करीत होते रामभाऊ कोल्हटकर. सगळेच एकमेकांना परिचित. त्यामुळे गप्पांचा फड जमणे हे आलेच. काही वेळाने सुनीताबाईंनी सूत्ने हाती घेतली. त्यांनी दोन्ही पुस्तकांची पार्श्वभूमी कथन केली. पुस्तकांचे प्रकाशन अर्थातच ज्येष्ठ प्रकाशक र्शी.पु. भागवत यांच्या हस्ते होणार होते. ‘आपुलकी’चे प्रकाशन त्यांनी केले. ते पुस्तक पुलंनी ज्येष्ठ लेखक र्शी.ना. पेंडसे यांना अर्पण केलेले. मग प्रकाशन झालं ‘सोयरे सकळ’चे. र्शीपुंनी पुस्तकाचे मुखपृष्ठ जमलेल्या सर्वांना दाखवले. सुनीताबाईंच्या गाजलेल्या ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकानंतरचे हे दुसरे पुस्तक. त्यांनी ‘सोयरे सकळ’ची ती प्रत सुनीताबाईंच्या हातात दिली. याची अर्पण पत्रिका काय असणार? पुलंसकट सर्वांनाच उत्सुकता. त्या उत्सुकतेनी ते सुनीताबाईंकडे पाहत होते. सुनीताबाईंनी पहिले पान उघडले आणि पुलंसमोर धरले. त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ‘सोयरे-सकळ’ हे पुस्तक सुनीताबाईंनी साक्षात पुलंनाच अर्पण केले होते. पुलंच्या डोळ्यांत आनंदार्शूंनी गर्दी केली. सगळं वातावरणच भावुक होऊन गेलं. त्या वातावरणात बदल घडवला तो ज्येष्ठ कवयित्नी शांता शेळके यांनी वाचून दाखवलेल्या एका काव्याने. त्यानंतर परत सगळे एकमेकांशी बोलण्यात रंगले. त्या गप्पांच्या आवाजाने पार्किंग भरून गेले. 
सुनीताबाईंनी टाळ्या वाजवत परत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आता त्या काय सांगतात याकडे सगळ्यांचे कान व लक्ष. त्या म्हणाल्या - ‘जी गोष्ट आजपर्यंत कधीही घडलेली नाही अशी एक कृती मी आज आत्ता करणार आहे. तुम्ही सर्वजण त्याचे साक्षी असणार आहात. मी भाईला नमस्कार करते.’ असे म्हणत त्यांनी पुढच्याच क्षणी पुलंना वाकून नमस्कार केला. आयुष्यभर पुलंशी बरोबरीच्या नात्यानं वागणार्‍या सुनीताबाईंच्या या कृतीनं सगळेच अचंबित झाले. वातावरणात एकदम शांतता पसरली. या शांततेचा भंग करीत पुढच्याच क्षणी पुलंनी मला हाक मारली व म्हणाले - ‘सतीश, या घटनेचं प्रूफ मला हवंय. हा फोटो मला हवाय.’ त्यांच्या या वाक्याने वातावरणातला तो ताण कुठल्याकुठे नाहीसा झाला. मग सुनीताबाईंनी परत एकदा वाकून पुलंना नमस्कार केला अन् तो क्षण मी कॅमेराबद्ध केला. आज त्या आठवणींनीही माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. इतकी मोठी ही माणसं अन् किती साधेपणा.
12 जून 2000ला पु.ल. अनंताच्या प्रवासाला निघून गेले. काही न काही कामानिमित्त माझं ‘मालती-माधव’मध्ये जाणं सुरूच राहिलं. भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या भावमुद्रा असलेल्या माझ्या पहिल्या थीम कॅलेंडरमध्ये मला पुलंनी माझ्या त्या प्रकाशचित्नांवर लिहिलेला अभिप्राय छापायचा होता. अभिप्राय होता - ‘या अप्रतिम छायाचित्नातून स्वर ऐकू येतात.’ मी सुनीताबाईंना भेटलो. अभिप्राय मराठीत होता. कॅलेंडर इंग्लिशमध्ये. मी मित्नाकडून त्याचं भाषांतर करून घेतलेलं. ते वाचल्यावर सुनीताबाई म्हणाल्या, ‘हे भाषांतर फारच गद्य वाटतंय. मला जरा वेळ द्या. मी तुम्हाला याचं रूपांतर करून देते.’ त्यांचा कवितांचा अभ्यास व प्रेम दोन्ही प्रचंड. संध्याकाळी 4 वाजता मला त्यांचा फोन आला. म्हणाल्या - ‘हं. घ्या लिहून. ‘The excellent photographs create musical melodies in the minds.’  ते सर्मपक आणि काव्यात्मक रूपांतर ऐकून मी आनंदून गेलो. माझ्या त्या ‘म्युॅझिकॅलेंडर’वर अवतरलेला पुलंचा तो अभिप्राय आणि त्याबरोबरच त्यांची स्वाक्षरी यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
सुनीताबाईंचा नेटकेपणा, त्यांची सौंदर्यदृष्टी ही नेहमी अनुभवास येत असेच; पण माझ्या कायमच लक्षात राहील तो त्यांचा कोणत्याही गोष्टीतील अचूकतेचा ध्यास. ‘सोयरे-सकळ’ या पुस्तकानंतर त्यांचे प्रकाशित झालेले पुढचे पुस्तक म्हणजे ‘मण्यांची माळ’. ते प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसांनी मी ते डेक्कन जिमखान्यावरून विकत घेतले. वेळ संध्याकाळची. तेथूनच मी त्यांना फोन केला. परत एकदा ‘काssय हो?’  अशी त्यांची विचारणा. मी नुकतेच घेतलेल्या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी हवी आहे असे सांगितले. त्यांनी किती वेळात येऊ शकाल? असे विचारले. मी त्यांना म्हणालो - ‘पाचच मिनिटांत पोहोचेन. आत्ता डेक्कनवरच आहे.’ आणि अक्षरश: पाच मिनिटात मी तेथे पोहोचलो. त्यांनी पुस्तकाचे पहिले पान उघडून सही केली, ‘सुनीता देशपांडे 15.10.2003.’ मग इतर काही बोलणे झाले व मी लगेचच निघालो.
पुढच्याच दिवशी त्या छोटेखानी पुस्तकात मी पूर्ण गढून गेलो. एकतर मला त्यांची लेखनशैली अतिशय आवडे व त्यांनी त्या पुस्तकात निवडलेले बारा लेखही अतिशय सुंदर. त्यातही ‘डोडी’ या त्यांच्या नातवाने पाळलेल्या आणि बराच वेळ त्यांच्याच घरात वास्तव्यास असलेल्या कुत्र्याविषयी लिहिलेला लेख फारच सुंदर. मी ते पुस्तक वाचत असतानाच मला सुनीताबाईंचा फोन आला. त्या म्हणाल्या, काल तुम्ही ‘मण्यांची माळ’ या माझ्या पुस्तकावर सही घेऊन गेलात ना?’ माझे उत्तर अर्थातच हो असे होते. त्या पुढे म्हणाल्या, ‘उद्या तुम्ही ते सही असलेले पुस्तक परत घेऊन या.’ मला काही उलगडाच होईना. पण काय बोलणार? मी त्यांच्या त्या म्हणण्याला होकार दिला. दुसर्‍या दिवशी मी पुस्तक घेऊन त्यांच्या घरी हजर. त्यांच्या हातात मी ते पुस्तक दिले. काहीही न बोलता त्यांनी ते पुस्तक पूर्णपणे पान अन् पान निरखून पाहिले. आणि मग माझ्या हातात परत दिले. आताही मला काही उलगडा होईना. मग त्यांनी कारण सांगितले - ‘अहो, आज अजून एक गृहस्थ आले होते सही घ्यायला. त्या पुस्तकातील कागद खराब होता. त्यावर बरेचसे काळे ठिपके होते. संपूर्ण पुस्तकभर ते ठिपके होते. आणि मग काही ठिकाणी अक्षरांवर एखादा ठिपका आला तर तो अनुस्वरासारखा दिसत असल्याने मजकुराचा अर्थच बदलत होता. मग मला तुमच्या पुस्तकावर केलेली सही आठवली. म्हणून मी तुम्हाला फोन केला. मी काही कॉपीही मागवून ठेवल्या आहेत.’ पण सुदैवाने माझ्याकडची कॉपी स्वच्छ कागदाची होती आणि त्यामुळे सुनीताबाईंचे समाधान झाले होते.
अशी जागरूकता असलेले लेखक-लेखिका किती असतील? कोणी घेईल अशी तसदी? पण अशा व्यक्ती थोड्याच असतात आणि त्यांचा तो स्वभावच त्यांच्याबद्दल चुकीचे समज पसरवण्यास कारण ठरत असेल का? 
(पूर्वार्ध)
sapaknikar@gmail.com                                  
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)

Web Title: The great memories of Sunitabai Deshpande and P. L. Deshpande by Sateesh Paknikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.