'निधनाच्या आदल्या रात्री 8.30 वा अजित पवारांसोबत फोनवर काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:55 IST2026-02-13T19:54:18+5:302026-02-13T19:55:13+5:30
"मात्र, ते सुरुवातीला, जे एक वाक्य बोलून गेले, मग पुन्हा थांबले आणि पुन्हा बोलले, ते पहिलं वाक्य मी आजही विसरू शकत नाहीये," असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

'निधनाच्या आदल्या रात्री 8.30 वा अजित पवारांसोबत फोनवर काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी सांगितलं
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सातत्याने नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. अगदी आदल्या दिवशीपर्यंत काय-काय घटना-घडामोडी झाल्या, यासंदर्भातही खुलासे होत आहेत. आता, अजित दादा यांच्या विमान अपघाताच्या आदल्या रात्री आपण दादांना फोन केला होता. शेतकऱ्यांशी संबंधित काही सार्वजनिक कामांसंदर्भात चर्चा झाली. जिल्हा परिषद निवडणुसीसंदर्भात चर्चा झाली. यावर आता आपली भेट केव्हा होणार असे विचारले असता, आता आपली भेट होणार नाही, मी सात-आठ दिवस दौऱ्यावर असेन, असे दादा म्हणाले होते, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत अजित दादांच्या शोकसभेत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले पटेल? -
प्रफुल पटेल म्हणाले, "अजित दादा यांच्या निधनाच्या आदल्या रात्री, साधारणपणे ८:३० वाजण्याच्या सुमारास फोन केला. काही कामांसंदर्भात बोललो. तेथील काही सार्वजनिक कामे होती, शेतकऱ्यांशी संबंधित. यावर दादा म्हणाले की, 'मी त्वरित करतो'. तेथे काही स्थानिक जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. त्यासंदर्भात एखाद मिनिट आमची चर्चा झाली."
पटेल पुढे म्हणाले, "यानंतर, मी दादांना विचारले की, 'आता आपली भेट केव्हा होणार?' आता बघा, याला नियती म्हणा, योगायोग म्हणा अथवा काहीही म्हणा, मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. मात्र, त्यांच्या तोंडून असे शब्द बाहेर आले..., ते मराठीत म्हणाले 'प्रफुल भाई, आता आपली भेट होणार नाही... आणि एक पॉझ घेत म्हणाले, 'मी सात-आठ दिवस दौऱ्यावर असेन. यामुळे मला तुम्हाला भेटता येणार नाही.'"
"मात्र, ते सुरुवातीला, जे एक वाक्य बोलून गेले, मग पुन्हा थांबले आणि पुन्हा बोलले, ते पहिलं वाक्य मी आजही विसरू शकत नाहीये," असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.