‘विश्वगुरू’ ही आपली कल्पना म्हणजेच आध्यात्मिक महाशक्ती : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 07:44 IST2026-05-17T07:44:11+5:302026-05-17T07:44:20+5:30
बंगळुरू : भारताची विश्वगुरू होण्याची महत्त्वाकांक्षा आध्यात्मिक महाशक्ती म्हणून उदयास येण्यात दडली असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे ...

‘विश्वगुरू’ ही आपली कल्पना म्हणजेच आध्यात्मिक महाशक्ती : मुख्यमंत्री
बंगळुरू : भारताची विश्वगुरू होण्याची महत्त्वाकांक्षा आध्यात्मिक महाशक्ती म्हणून उदयास येण्यात दडली असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. श्री श्री रविशंकर यांनी या माध्यमातून भारतीय तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञानाला जागतिक व्यासपीठ मिळवून दिल्याचे ते म्हणाले.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन’ला ४५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बंगळूरू येथील आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला जगभरातील नेते, कलाकार, खेळाडू आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री श्री रविशंकर यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
आपण भारताला विश्वगुरू म्हणून पाहतो तेव्हा ती संकल्पना केवळ एक आर्थिक महासत्ता किंवा लष्करी महासत्ता म्हणून नसते. तर, आपण ज्या विश्वगुरुची कल्पना करतो ती एक आध्यात्मिक महासत्ता अशी आहे. अशी महासत्ता बनण्याचा मार्ग गुरु श्री श्री रविशंकर यांनी दाखवून दिला असल्याचे फडणवीस म्हणाले.
भारताच्या आध्यात्मिक वारशाचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, भारताने एक गौरवशाली इतिहास पाहिला आहे. परंतु कोणताही देश केवळ आपल्या इतिहासाच्या जोरावर महान होऊ शकत नाही. आपली महानता टिकवून ठेवण्यासाठी मूल्ये, विचार आणि आपले आध्यात्मिक ज्ञान जगासमोर एका नवीन स्वरूपात सादर करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने अनेक देशांतील लोकांच्या जीवनाला स्पर्श करीत जगण्याचे साधन आणि जीवनाचा अंतिम उद्देश शोधण्यास मदत केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. गुरुदेवांनी सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून मानवी जीवनात बदल घडवल्याचे सांगून जीवनात नव्याने आनंद मिळवण्यास मनुष्यास मदत झाल्याचे ते म्हणाले.
नैसर्गिक शेतीतील योगदानाचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव
आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने गेल्या काही दशकांत महाराष्ट्रात, विशेषतः जलसंधारण आणि नैसर्गिक शेती उपक्रमांमध्ये दिलेल्या योगदानाचा गौरव केला.
आर्ट ऑफ लिव्हिंगने जलसंधारणात केलेल्या कार्यामुळे लोकांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगने निराश झालेल्या शेतकऱ्यांना प्रेरणा दिली. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आले.
आपत्ती आणि संकटांच्या काळात संस्थेने केलेल्या मदतकार्यात हजारो स्वयंसेवकांनी जिथे गरज होती तिथे शिस्त आणि निष्ठेने काम केले.
ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी एकदा धर्म संसदेत आपले आध्यात्मिक तत्त्वज्ञान मांडले आणि संपूर्ण जगाने ते मान्य केले, त्याचप्रमाणे गुरुदेवांनी जागतिक नेत्यांना एकत्र आणले आणि त्यांना बोलण्यासाठी प्रेरित केले.