...हा आत्मविश्वास कुठून येतो?; संजय राऊतांचा भाजपासह शिंदे गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 17:02 IST2023-02-16T17:02:17+5:302023-02-16T17:02:27+5:30

महाराष्ट्रात जे वातावरण गढूळ झाले आहे. पैशाचा आणि सत्तेचा वापर करून सरकार पाडले जाते. त्यामुळे देशाला दिशादर्शक ठरावा असा पारदर्शक निर्णय यावा असं संजय राऊतांनी म्हटलं.

Uddhav Thackeray MP Sanjay Raut criticized the BJP-Eknath Shinde group | ...हा आत्मविश्वास कुठून येतो?; संजय राऊतांचा भाजपासह शिंदे गटावर निशाणा

...हा आत्मविश्वास कुठून येतो?; संजय राऊतांचा भाजपासह शिंदे गटावर निशाणा

मुंबई - सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूने सुनावणी झाली. न्यायालयातील सुनावणीकडे आमचं बारीक लक्ष आहे. कोर्टाने निर्णय राखून ठेवलाय. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे आणि फुटीर गटाचे आमदार, नेते हे वारंवार निकाल आमच्याच बाजूने लागेल. चिन्ह आम्हाला मिळेल हा आत्मविश्वास येतो कुठून? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई व्हायला हवी. चिन्ह फुटीर गटाला मिळेल हे खात्रीने कसे सांगू शकतात? असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, आमच्या वकिलांनी कोर्टात ठामपणे आणि मजबुतीने बाजू मांडली आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. या देशात संविधान, कायदा, संसदीय लोकशाही यांचा मुडदा कुणी पाडू शकले नाही. रामशास्त्री बाणाचे अनेक जण न्यायव्यवस्थेत आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचं सत्य आहे. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वारंवार भूमिका मांडली आहे. शिवसेना खरी कुठे आहे ते निवडणुकीला सामोरे जावू. मग जनता ठरवेल खरी शिवसेना कुणाची? आमची तयारी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच अनेक युक्तिवाद कोर्टात मांडले गेले. गुवाहाटीत बसून तुम्ही नोटीस पाठवता असे अनेक मुद्दे समोर आले आहेत. आमची शिवसेना खरी सांगायचं, विधिमंडळ पक्ष सांगायचा. रेड्यांच्या पाठीवर बसून यमासारखं निर्णय घ्यायचे हे अनेक मुद्दे कोर्टात आले आहे. आमच्या मागण्या रेकॉर्डवर आहे. निर्णय स्पष्ट आणि पारदर्शक यावा. महाराष्ट्रात जे वातावरण गढूळ झाले आहे. पैशाचा आणि सत्तेचा वापर करून सरकार पाडले जाते. त्यामुळे देशाला दिशादर्शक ठरावा असा पारदर्शक निर्णय यावा. सत्यमेव जयते प्रमाणे सत्याचा, आमचा विजय होईल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, शिवजयंती उत्सव वार्डावार्डात गल्लीबोळात शिवसेना साजरी करते. भाजपाला आता शिवाजी महाराज आठवतात. निवडणूक आल्यानंतर त्यांना शिवाजी महाराज आठवतात. शिवाजी महाराजांनी बेईमाना कोथळा काढला होता, बोटे छाटली होती हे त्यांनी विसरू नये. शिवनेरीवर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा जन्म झाला. त्याच शिवनेरीची माती घेऊन अयोध्येत उद्धव ठाकरे गेले होते. महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी करणाऱ्यांना अमित शाह आणि भाजपा कसे पाठिशी घालतायेत हे आकाशातून शिवाजी महाराज पाहत असतील. हा महाराष्ट्र बेईमानांचे बोटे छाटणारा आहे असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. 
 

Web Title: Uddhav Thackeray MP Sanjay Raut criticized the BJP-Eknath Shinde group