Gas: गॅस सिलिंडरची साठेबाजी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांच्या तावडीत सापडलात तर होणार जेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 16:59 IST2026-03-11T16:57:23+5:302026-03-11T16:59:22+5:30
मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या जागतिक घडामोडींचा फटका भारतालाही बसत असून नैसर्गिक वायूच्या कमतरतेमुळे देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Gas: गॅस सिलिंडरची साठेबाजी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांच्या तावडीत सापडलात तर होणार जेल!
मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या जागतिक घडामोडींचा फटका भारतालाही बसत असून नैसर्गिक वायूच्या कमतरतेमुळे देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या कठीण काळात गॅस सिलिंडरची साठेबाजी करून काळाबाजार करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध नागपूर पोलिसांनी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. "साठेबाजी करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करून त्यांना जेलची हवा दाखवू," असा सज्जड इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल यांनी दिला आहे.
पोलीस आयुक्त सिंघल यांनी स्पष्ट केले की, गॅस सिलिंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर केवळ गुन्हे दाखल होणार नाहीत, तर त्यांच्यावर 'एस्मा' आणि 'अत्यावश्यक वस्तू कायदा' अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. गुन्हे शाखेची सर्व पथके सध्या सतर्क झाली असून साठेबाजांची यादी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गॅस वितरण केंद्रे आणि वाहतूक होणाऱ्या मार्गांवर पोलिसांनी गस्त वाढवली आहे. साठेबाजी रोखण्यासाठी विशेष पोलीस पथके तैनात करण्यात आली असून ते संशयास्पद ठिकाणांची तपासणी करत आहेत.
गॅस टंचाईबाबत सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर आहे. चुकीची माहिती पसरवल्यास कडक कारवाई केली जाईल. गॅस वितरण केंद्रांवर गर्दी झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच नागपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि गॅस सिलिंडरचा विनाकारण साठा करू नका. साठेबाजी करणाऱ्यांची माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
दरम्यान, सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात व्यावसायिक वापराचा गॅस पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे, अशा आशयाचा मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या मेसेजमुळे हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने हे सर्व दावे फेटाळून लावले असून हा मेसेज दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले.