राजेश शेगोकारनागपूर : अशोक खरात प्रकरणाने पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवला आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबातील महिला आणि मुली त्याच्या जाळ्यात अडकल्या, हे केवळ धक्कादायक नाही तर चिंताजनक वास्तव आहे. प्रश्न केवळ एका भोंदूबाबाचा नाही; प्रश्न आहे तो अशा बाबांच्या नादी लागणाऱ्या समाजमानसाचा. मुळात हे प्रकरण आपल्या समाजाच्या वैचारिक दिवाळखोरीचे भयावह चित्र आहे. सुशिक्षित, सुसंस्कृत, सामाजिकदृष्ट्या सक्षम अशा महिलाही या जाळ्यात अडकतात, ही बाब केवळ धक्कादायक नसून, 'शिक्षण' आणि 'विवेक' यातील मूलभूत फरक अधोरेखित करणारी आहे.
व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ झाले.' कुसुमाग्रजांच्या 'पर्वणी' कवितेतील ह्या ओळी उपरोधाने म्हटल्या गेलेल्या असल्या तरी, आज खऱ्या होऊ पाहत आहेत. ज्या संतांनी आयुष्यभर अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, नशीब, फलज्योतिष यांवर घणाघाती घाव घातले, हयातभर लोकांच्या डोळ्यांत बुद्धिप्रामाण्यवादाचे झणझणीत अंजन घातले, त्या समाजाला परत कृतिशून्य, निर्बुद्ध, लाचार बनविणारी खरातसारखी व्यवस्था राजरोसपणे राजाश्रय मिळवत आहे.
नाशिकमध्ये हा प्रकार समोर आला, मात्र कमीअधिक प्रमाणात हे तथाकथित बाबा राज्यभर आहेत. विदर्भातही अंधश्रद्धेच्या सावटाखाली उभे राहणारे भोंदूबाबांचे साम्राज्य या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अमरावतीत एका मठाच्या प्रमुखाने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता, तर नागपुरात एका तथाकथित 'महाराजां'ने भक्ताच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तब्बल सात वर्षांची शिक्षा भोगली आहे. बुलढाण्यातील सैलानी परिसरात अशा बाबांचे जाळेच पसरले असल्याचे चित्र वारंवार समोर आले आहे.
काही वर्षांपूर्वी गाजलेले शेळके बाबा प्रकरणही याच मालिकेतील एक धक्कादायक उदाहरण ठरले होते. गडचिरोली व मेळघाटातील दुर्गम भागात तर अघोरी साधनेच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळणारे प्रकार आजही सुरू असल्याची भीतीदायक वास्तवता आहे. कधी 'कासव' मिळवून देण्याचे आमिष, कधी 'दोन तोंडाचा साप' दाखवण्याची फसवणूक, तर कधी 'पैशाचा पाऊस' पाडण्याच्या नावाखाली जंगलात गुप्त पूजा-अशा प्रकारांनी अंधश्रद्धेचा बाजार तेजीत आहे.
मुळात अशा बाबांचे फावण्यामागे एक खोल मानसिक प्रक्रिया कार्यरत असते. आधुनिक जीवनातील असुरक्षितता, स्पर्धा, ताण आणि भविष्याबद्दलची अनिश्चितता या साऱ्यांमुळे माणूस तर्कापेक्षा आधार शोधू लागतो. हा आधार जेव्हा विज्ञान, तर्क आणि मानवी मूल्यांतून न सापडता 'अलौकिक' शक्तीत शोधला जातो, तेव्हा भोंदूबाबांचा उदय अपरिहार्य ठरतो. म्हणजेच, भोंदूबाबा हे कारण नसून, समाजातील विवेकहीनतेचा परिणाम आहे.
फलज्योतिष, अंकशास्त्र, 'ऊर्जा उपचार', 'दैवी स्पर्श' या सर्व संकल्पना मुळात मानवी दुर्बलतेवर आधारलेल्या आहेत. त्या माणसाला प्रश्न विचारण्यापासून परावृत्त करतात आणि 'तुमच्या नशिबातच आहे' अशी समर्पणाची मानसिकता निर्माण करतात. एकदा का माणूस स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्वास गमावतो, तेव्हा तो मानसिक गुलाम बनतो आणि मानसिक गुलामगिरी हीच सर्वात धोकादायक गुलामगिरी असते. भारतीय संविधानाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे कर्तव्य दिले आहे, पण वास्तवात आपण 'विज्ञान वापरणारे' आहोत; 'विज्ञान विचार करणारे' नाही. मोबाइल, इंटरनेट, आधुनिक वैद्यक या सर्वाचा वापर करणारा माणूसच 'ग्रहदोष', 'नजर लागणे', 'चमत्कार' यांवर विश्वास ठेवतो, ही आपल्या विचारप्रक्रियेतील विसंगती आहे. महाराष्ट्राला राष्ट्रसंत गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांसारख्या अनेक प्रबोधनकार संतांची परंपरा लाभली आहे. या परंपरेचा गाभा होता प्रश्न विचारणे. गाडगेबाबांनी लोकांना थेट विचारले आणि दैववाद खोडून काढला; पण आजचा समाज प्रश्न विचारण्यापेक्षा 'श्रद्धा' या नावाखाली शरण जाणे पसंत करतो.
अशोक खरात प्रकरण हे म्हणूनच 'व्यक्ती'पेक्षा 'प्रवृत्ती'चे प्रतीक आहे. ही प्रवृत्ती मोडायची असेल, तर केवळ कायदे किंवा कारवाई पुरेशी नाही. विवेकाची सामाजिक चळवळ उभी करावी लागेल. शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन केवळ अभ्यासक्रमापुरता न ठेवता तो जीवनपद्धती बनवावा लागेल. आपण भक्त होणार की विचारक? कारण समाजाचा भविष्यकाळ हा श्रद्धेवर नव्हे, तर विवेकावर उभा राहतो. आणि जो समाज विवेक हरवतो, तो शेवटी कोणत्यातरी 'बाबा'च्या पायाशी नतमस्तक होतो. स्वतःची स्वतंत्र विचारशक्ती गमावून बसतो. संत ज्ञानेश्वर म्हणतात, 'मी अविवेकाची काजळी, फेडूनि विवेक दीप उजळी' मनातील अविवेक, अज्ञान आणि अहंकाराचा अंधार विवेकाच्या दिव्यानेच दूर करता येऊ शकतो. हे लक्षात घेऊन संतांनी दिलेला विवेकाचा दीप पुन्हा प्रज्वलित करण्याची हीच वेळ आहे. अन्यथा, भोंदूबाबांचे साम्राज्य वाढतच राहील.
Web Summary : Ashok Kharat's case exposes society's blind faith in charlatans, highlighting a lack of critical thinking. Despite education, people fall prey to superstition, revealing a deeper societal problem. Promoting rational thought and questioning beliefs are crucial to combat this trend.
Web Summary : अशोक खरात का मामला समाज के ढोंगियों पर अंधे विश्वास को उजागर करता है, जो आलोचनात्मक सोच की कमी को दर्शाता है। शिक्षा के बावजूद, लोग अंधविश्वास का शिकार हो जाते हैं, जो एक गहरी सामाजिक समस्या को उजागर करता है। इस प्रवृत्ति से निपटने के लिए तर्कसंगत विचार और मान्यताओं पर सवाल उठाना महत्वपूर्ण है।