“दाल में कुछ काला हैं… अजितदादांचे विमान अपघाती निधन योगायोग की षड्यंत्र”; आता कुणाला शंका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 14:25 IST2026-03-16T14:21:57+5:302026-03-16T14:25:39+5:30
Bhaskar Jadhav News: अजित पवारांचे निधन होऊन इतके दिवस झाले तरी केंद्र किंवा राज्य सरकारने विमान अपघाताबाबत निवेदन केलेले नाही, असे या नेत्यांनी म्हटले आहे.

“दाल में कुछ काला हैं… अजितदादांचे विमान अपघाती निधन योगायोग की षड्यंत्र”; आता कुणाला शंका?
Bhaskar Jadhav News: अजित पवार यांचा अपघात होता की घातपात होता? देशात आणि राज्यात ज्यांनी ती घटना पाहिली त्यांच्या मनात तो अपघात नाही, तर घातपातच होता अशी भावना होती, ती भावना आजही आहे. ज्या गोष्टी आणि जी वक्तवेयं समोर येत आहेत त्यामुळे ही भावना अधिक दृढ होत आहे, अपघात झाला नाही तर घातपात झाला या विषयाला पुष्टी मिळत आहे, असा दावा ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी केला.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाबाबत शंका उपस्थित केली आहे. अजित पवारांच्या अपघाताचा विषय गंभीर आहे. या विषयात उथळ विधाने करणे योग्य नाही. पहिल्या दिवसापासून माझ्या मनात एक विषय होता की, पिंपरी चिंचवड येथील एका भाषणात अजित पवारांनी पहिल्यांदा सांगितले की, ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला, ज्यांनी ७० हजार कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसलो आहे.
भाजपाच्या फार मोठ्या भ्रष्टाचाराची फाइल माझ्याकडे
अजितदादांच्या या वक्तव्यानंतर मंत्र्यांची किंवा नेत्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घ्या. अप्रत्यक्ष दम दिले गेले, तुमची फाईल निकालात निघालेली नाही. तुमची केस कोर्टात आहे. तोंडाला लगाम लावा, असे सांगितले गेले. त्यानंतर १५ जानेवारीला अजित पवारांनी पुन्हा सांगितले की, भाजपाच्या फार मोठ्या भ्रष्टाचाराची फाइल माझ्याकडे आहे. त्यानंतर देखील समोर आले की, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत आहेत, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा २८ जानेवारीला अपघात व्हावा हा योगायोग आहे की षड्यंत्र आहे हे मी सांगू शकत नाही. तपास यंत्रणांनी यावर खुलासा करण्याची गरज आहे. आजपर्यंत महाराष्ट्र सरकारने, सरकारच्या वतीने किंवा केंद्र सरकारने निवेदन केले नाही. फडणवीस सरकारनेही निवेदन केले नाही. मोदींनीही निवेदन केले नाही. त्यामुळे दाल में कुछ तो काला हैं, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.