राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनिकरणाच्या चर्चेवर सुनील तटकरेंचं मोठं विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:11 IST2025-05-29T18:10:14+5:302025-05-29T18:11:42+5:30
NCP News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही गटांच्या विलिनिकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनिकरणाच्या चर्चेवर सुनील तटकरेंचं मोठं विधान, म्हणाले...
मुंबई - दोन वर्षांपूर्वी अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट अस्तित्वात आले होते. त्यापैकी अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह मिळालं होतं. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गट तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट वरचढ ठरला होता. दरम्यान, आता गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही गटांच्या विलिनिकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेला नाही आणि आमच्या विचारार्थही नाही. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमध्येच राहणार आहोत या भूमिकेशी ज्यांना समरस व्हायचे असेल किंवा या भूमिकेबरोबर वाटचाल करायची असेल त्यांचे जरूर पक्षात स्वागत आहे. त्यामुळे विलिनीकरणाचा मुद्दाच नाही. आमच्याकडे प्रस्तावच नाही किंवा कशातच नाही आज त्या गोष्टीची चर्चा आमच्या स्तरावर अस्तित्वात नाही. त्याबद्दल भाष्य करण्यात काय अर्थ आहे, सुनिल तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ज्या क्षणापर्यंत विलिनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर आला नाही. त्याची चर्चाही नाही. त्यामुळे विरोध असणे... अनुकूल असणे... प्रतिकूल असणे... हा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे प्रस्ताव नाही त्यावर आज विलिनीकरणाचा प्रश्नच नाही. आज आम्ही आमच्या मूळ विचारधारेसोबतच एनडीएमध्ये सहभागी आहोत आणि एनडीएमध्ये सहभागी असल्यामुळे आज आमचा पुढचा राजकीय प्रवास त्यांच्यासोबत देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्यामुळे त्यात बदल होण्याचे कारण नाही असेही सुनील तटकरे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकी नंतर आम्ही राहतो की नाही असा प्रश्न निर्माण केला जात होता. आता त्या सर्व प्रश्नांची उत्तरे राजकीयदृष्ट्या राज्यातील जनतेने दिली आहेत. त्यामुळे जर - तरच्या मुद्द्यावर मी प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे कुठलेही वक्तव्य करणे चुकीचे ठरेल. एकदा नक्की कळूदे की, प्रश्न विलिनीकरणाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर चर्चेला आला मग पुढच्या बाबी येतील. परंतु जे नाहीच आणि दिसत नाही त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे. त्यामुळे आता सूत्रांच्या बातम्या किंवा ती सुत्रे आम्हाला शोधावी लागतील असे उत्तर सुनिल तटकरे यांनी दिले.