“आम्ही पहिल्या दिवसापासून...”; अजितदादांच्या विमान अपघात चौकशीवर सुनील तटकरे थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 14:12 IST2026-02-28T14:10:46+5:302026-02-28T14:12:38+5:30
Sunil Tatkare News: दादांच्या निधनाने फक्त महाराष्ट्रच नाही, देश दु:खात आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.

“आम्ही पहिल्या दिवसापासून...”; अजितदादांच्या विमान अपघात चौकशीवर सुनील तटकरे थेट बोलले
Sunil Tatkare News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला एक महिना पूर्ण झाला. अद्यापही संपूर्ण महाराष्ट्र अजित पवार यांच्या निधनाबाबत हळहळ व्यक्त करताना दिसत आहे. या महिन्याभरात अनेक घडामोडी घडल्या. रोहित पवारांनी या विमान अपघातावर शंका व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद, पालकमंत्रीपद आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत राजकारणात सक्रीय सहभाग नोंदवला. या अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी सविस्तर भाष्य केले.
अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाच्या या घटनेला महिना उलटल्यानंतर जय पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे हे सर्वजण विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ज्या ठिकाणी अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर सुनील तटकरेंनी म्हटले की, दादांना जाऊन एक महिना झाला. त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो. आमची सुरुवातीपासून मागणी आहे. सरकारने चौकशी समिती स्थापन केली आहे. चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणांनी सखोल तपास करावा. सगळ्या बाजूने तपास करावा. दादांचे निधन झाले त्यावेळी वाहिनींना जबाबदारी द्यावी, अशी भूमिका आम्ही घेतली. दादांनंतर वहिनींनी जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली. त्यांनी जबाबदारी स्वीकारली, त्याचे ऋण आम्ही व्यक्त करतो, असे तटकरे यांनी म्हटले आहे.
पहिल्या दिवशी त्या खात्याच्या केंद्रीय मंत्री महोदयानी चौकशी केली
सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे की, अशा प्रकारचे विमान अपघात घडतात त्यावेळी स्वायत्त तपास यंत्रणा भारत सरकारने स्थापन केलेली आहे. पहिल्या दिवशी त्या खात्याच्या केंद्रीय मंत्री महोदयानी चौकशी केली. मुख्यमंत्र्यांनी सीआयाडी चौकशीचे आदेश दिले. तशी चौकशी सुरू झाल्याची माहिती देण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. पक्षाच्या वतीने निवेदन दिले की, या सर्व घटनेची सीबीआय चौकशी केली जावी. दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी पत्र व्यवहार केला, असेही तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, वेगवेगळ्या व्यक्तींनी या घटनेबाबत काही प्रश्न निर्माण केले. काहींनी त्यांचे मत व्यक्त केले. राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी आणि वरिष्ठ सहकाऱ्यांची भूमिका राहिली आहे की, यंत्रणेमार्फत तपास होत असताना ज्या बाबी उपस्थित झाल्यात, त्या बाबींसह सखोल तपास व्हावा. जागतिक स्तरावरील अशा अपघाताची चौकशी करण्यासाठी संस्था आहेत. त्यांची मदत घेतली जावी. दादांच्या निधनाने फक्त महाराष्ट्रच नाही, देश दु:खात आहे. प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. हा सर्व अहवाल महाराष्ट्रासह देशातील जनतेसमोर यावा अशी मागणी आहे, असेही तटकरे म्हणाले.