सिंधुदुर्गात महायुतीच्या विजयाला अपक्षांकडून गालबोट, नितेश राणे संतप्त, म्हणाले, 'अदृश्य हातांना...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:35 IST2026-02-09T15:32:06+5:302026-02-09T15:35:59+5:30
Sindhudurg Zilla Parishad Election Result: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंडखोर अपक्षांमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीला मिळालेल्या यशानंतरही भाजपाने नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सिंधुदुर्गात महायुतीच्या विजयाला अपक्षांकडून गालबोट, नितेश राणे संतप्त, म्हणाले, 'अदृश्य हातांना...'
भाजपाचे खासदार नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निकालांमध्ये जिल्हा परिषदेच्या ५० पैकी ३० हून अधिक जागांवर भाजपा-शिंदेसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंडखोर अपक्षांमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीला मिळालेल्या यशानंतरही भाजपाने नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अपक्ष निवडणूक लढवणाऱ्यांमागे ताकद उभी करणाऱ्या अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आली आहे, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांबाबत प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले की, आम्ही महायुतीच्या माध्यमातून नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या. तसेच या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील मतदारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेलं मार्गदर्शन आणि दिलेला पाठिंबा यामुळे आम्ही सांधिक काम करू शकलो. सिंधुदुर्गाचा विकास अधिक ताकदीने करण्याची चांगली संधी आमच्याकडे चालून आली आहे, असे नितेश राणे म्हणाले.
यावेळी महायुती आणि भाजपाच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवारांकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाबाबत नितेश राणे म्हणाले की, या निवडणुकीत जे अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत, त्यांचा उल्लेख तुम्ही भाजपाचे बंडखोर असा करू शकता. या जिल्ह्यामध्ये भाजपा आणि महायुतीला पराभूत करण्याची ताकद ना उद्धव सेनेमध्ये आहे ना महाविकास आघाडीमध्ये आहे. जर आम्हीच आमचं घर नीट व्यवस्थित पद्धतीने ठेवलं असतं, महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलो. मात्र काही अपक्ष उमेदवारांचा जो काही प्रकार झाला आहे. तो एका चांगल्या कामगिरीला गालबोट लावणारा आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून जे काही अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत ते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वापर करून, त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे, असं सांगून भाजपाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून निवडून आले आहेत. ही बाब ना रवींद्र चव्हाण यांना मान्य असेल ना आम्हा कुणालाच मान्य आहे, असेही नितेश राणे म्हणाले.
महायुती करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी सहमतीने केला होता. मात्र तरीही काही जणांनी शर्टावर एका बाजूला कमळ चिन्ह लावून दुसऱ्या बाजूला कमळ चिन्हाचे उमेदवार पाडण्यासाठी ताकद लावली. जर या सर्वांनी आमच्यासोबत ताकद लावली असती तर आमचा एकतर्फी विजय झाला असता. आमच्या ५० पैकी ५० जागा निवडून आल्या असत्या. आता निकालांनंतर आम्ही महायुती म्हणून गोष्टीचा विचार करणार आहोत. तसेच जे मस्ती करणारे लोक आहेत. अदृश्य हातांच्या नावाखाली महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृष्य हातांच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करणारे जे लोक आहेत, त्या अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आलेली आहे, असा इशाराही नितेश राणे यांनी दिल आहे.