“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 11:18 IST2026-04-10T11:17:31+5:302026-04-10T11:18:23+5:30
Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल, तर संकुचित वृत्ती सोडली पाहिजे, असा सल्ला संजय राऊतांनी दिला.

“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut News: आमचे लोकसभेतील सगळे खासदार हे घट्ट आहेत. अडचणी काय आहे, तर विरोधी पक्षाच्या लोकांना महाराष्ट्रात अजिबात विकास निधी दिला जात नाही. हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध आहे. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना कोट्यवधींचा निधी देतात. परंतु, लाखो लोकांनी निवडून दिलेल्या इतर खासदारांना निधीपासून वंचित ठेवतात. तुमच्या खिशातले पैसे आहेत का?, असा थेट सवाल ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला.
राज्यात ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे गटाचे खासदार फोडण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या पक्षातील आठ खासदारांसोबत गुप्त बैठक केल्याच्या वृत्ताने महाराष्ट्रात राजकारणात खळबळ उडाली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, संजय राऊत यांनी या प्रकरणी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना महायुतीवर निशाणा साधला.
फडणवीस हे शिंदे यांच्या पक्षाचे ऑपरेशन करत आहेत
ऑपरेशन जे असते ते एकदाच केले जाते. वारंवार एखाद्या शरीराचे ऑपरेशन होते, तेव्हा ते डेडबॉडीचे ऑपरेशन असते. देवेंद्र फडणवीस यांनी सध्या त्यांच्या पक्षाची डेडबॉडी केलेली आहे. सध्या जे ऑपरेशन सुरू आहे, ते देवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे करत आहेत. शिवसेनेचे नऊ खासदार एकत्र आहेत. मी काही नावे वाचली तर मला हसायला आले. उद्या माझे नाव टाकतील. आदित्य ठाकरे यांचेही नाव टाकतील. या प्रकारच्या बातम्या वातावरण गरम करण्यासाठी पेरल्या जात आहेत किंवा आम्ही काहीतरी घडामोडी करत आहोत, हे दाखवण्यासाठी केले जात आहे. हे चुकीचे आहे, असे सांगत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल, तर संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. मी सगळ्यांचा आहे, मी लोकशाही तत्व मानतो. म्हणून विरोधी पक्षाचे आमदार, विरोधी पक्षाच्या खासदारांना समान न्याय देईन, अशी भूमिका स्वीकारली पाहिजे. तरच मोठी झेप घेता येईल. अन्यथा त्यांचे राजकीय अस्तित्व जोपर्यंत केंद्रात मोदी आहेत, तोपर्यंतच महाराष्ट्रात राहील, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला.