Maharashtra Cabinet Expansion: “आता चंद्रकांत पाटील, चिवाताई कुठेत”; संजय राठोडांच्या मंत्रिपदावरुन शिवसेनेचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 12:57 PM2022-08-09T12:57:20+5:302022-08-09T12:57:40+5:30
Maharashtra Cabinet Expansion: ज्यांचे मंत्रिपद जावे म्हणून अक्षरशः रान उठवले, त्यांनाच आता मांडीवर घेऊन बसणार आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
![shiv sena kishori pednekar slams eknath shinde and devendra fadnavis govt over sanjay rathod oath | Maharashtra Cabinet Expansion: “आता चंद्रकांत पाटील, चिवाताई कुठेत”; संजय राठोडांच्या मंत्रिपदावरुन शिवसेनेचा संताप shiv sena kishori pednekar slams eknath shinde and devendra fadnavis govt over sanjay rathod oath | Maharashtra Cabinet Expansion: “आता चंद्रकांत पाटील, चिवाताई कुठेत”; संजय राठोडांच्या मंत्रिपदावरुन शिवसेनेचा संताप](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/shiv-sena-sanjay-rathod_202208864793.jpg)
Maharashtra Cabinet Expansion: “आता चंद्रकांत पाटील, चिवाताई कुठेत”; संजय राठोडांच्या मंत्रिपदावरुन शिवसेनेचा संताप
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. मात्र, पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मागील मंत्रिमंडळातून राजीनामा द्याव्या लागलेल्या संजय राठोड यांना नव्या सरकारने पुन्हा एकदा मंत्री केले आहे. यावरून आता शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, आता चंद्रकांत पाटील, चित्रा वाघ कुठे आहेत, ते पाहावे लागले, अशी विचारणा करण्यात आलेली आहे.
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिपदावरून नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांचे मंत्रिपद जावे म्हणून अक्षरशः रान उठवले, त्यांनाच आता मांडीवर घेऊन बसणार आहेत. याचा अर्थ काय समजायचा, जनता सगळे पाहत आहे, अशी बोचरी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.
धुलाई मशीन मस्त, तिकडे गेले की धुऊन बाहेर निघतात
त्यांची धुलाई मशीन मस्त आहे. एकदा तिकडे गेले की धुऊन बाहेर निघतात. अब्दुल सत्तारांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. आता सत्तारांना कळेल की, तार कशी तोडली जाते ते, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला. तत्पूर्वी, बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे, ते आता फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रीमंडळात दिसणार आहे. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे, भाजपाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिले जाणे हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे, असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.