भारत जोडो यात्रा सोडून राहुल गांधी उद्या औरंगाबादमध्ये; नेमकं कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 20:56 IST2022-11-20T20:56:21+5:302022-11-20T20:56:28+5:30
14 दिवसांपूर्वी नांदेडमधून महाराष्ट्रात आलेली भारत जोडो यात्रा जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे.

भारत जोडो यात्रा सोडून राहुल गांधी उद्या औरंगाबादमध्ये; नेमकं कारण काय..?
औरंगाबाद:काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात असून, आज या यात्रेचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, यात्रेचा शेवटचा दिवस असूनही राहुल गांधी उद्या महाराष्ट्रातच असणार आहेत. राहुल गांधी उद्या औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत.
14 दिवसांपूर्वी नांदेडमधून महाराष्ट्रात आलेली यात्रा आज जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. दरम्यान, यात्रा सोडून राहुल गांधी उद्या(दि.21) हेलिकॅप्टरने औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर दाखल होतील. यानंतर ते औरंगाबाद विमानतळावरून खाजगी विमानाने गुजरातला जाणार आहेत. गुजरातमध्ये त्यांच्या सभा होणार आहे, त्यानंतर ते विमानाने पुन्हा औरंगाबाद विमानतळावर परततील आणि भारत जोडो यात्रेचा पुढचा प्रवास सुरू करतील.
औरंगाबादेत आल्यानंतर शहरातील मुकुंदवाडी बस स्थानक येथे संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे. 'राहुल गांधी उद्या औरंगाबाद येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुकुंदवाडी बसस्टॉप जवळ काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सायंकाळी 05:30 वाजता उपस्थित राहावे', असं आवाहन
औरंगाबाद काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी केले आहे.