इराण युद्धात अडकलेल्यांना परत आणणाऱ्यांचे राजकीय वैर बाजुला ठेवत विधानसभेत कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 05:03 IST2026-03-05T05:02:44+5:302026-03-05T05:03:14+5:30
भाजपचे आ. संजय केनेकर यांनी युद्ध परिस्थितीत राज्यातील अनेक लोक परदेशात अडकले असल्याचा विषय चर्चेला घेतला आणि त्यांना राज्यात आणण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली.

इराण युद्धात अडकलेल्यांना परत आणणाऱ्यांचे राजकीय वैर बाजुला ठेवत विधानसभेत कौतुक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एकसंघ शिवसेनेत फूट पडल्यानंतर, उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यातून विस्तव जात नाही. आज मात्र चक्क उद्धवसेनेचे आ. अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आणि सगळेच अवाक् झाले.
भाजपचे आ. संजय केनेकर यांनी युद्ध परिस्थितीत राज्यातील अनेक लोक परदेशात अडकले असल्याचा विषय चर्चेला घेतला आणि त्यांना राज्यात आणण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. त्यावर उद्धवसेनेचे अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांनी खासगी विमान पाठवून १६४ लोकांना आणण्याची व्यवस्था केल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या एक पाऊल पुढे असायला हवे, असे सांगून राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी परब यांनी केली.
अडकलेल्या नागरिकांसाठी सरकारचा हेल्प लाइन नंबर
त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासनाने तत्काळ पावले उचलली असून, व्हाॅटसॲप हेल्प लाइन नंबर जाहीर केला. संबंधित देशातील मराठी मंडळ आणि अन्य माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्यावतीने अडकलेल्यांना परत आणण्याबाबत स्तुत्य उपक्रम केला. राज्य सरकारने केंद्राशी संपर्क साधून अशी व्यवस्था करू इच्छिते, अशी विचारणा केली. मात्र, सगळ्याच राज्यांनी असे म्हटले, तर त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होईल आणि काही ठिकाणी एयर स्पेस सुरक्षित नाही.
ही प्रक्रिया केंद्राच्या अखत्यारीत झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे आपण त्यात पुढे जात नाही. पण, पुढील २-३ दिवसांत परिस्थिती सुधारेल, असे फडणवीस म्हणाले. भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून दुबई विमानतळावर अडकलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.