Toll: टोल पासचा सर्वाधिक फायदा पुणे, सोलापूरकर नागरिकांना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 10:23 IST2025-06-20T10:22:03+5:302025-06-20T10:23:57+5:30
Toll News: कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगर व्यावसायिक वाहनांसाठी ३ हजार रुपयांत फास्टॅग आधारित टोल पास देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला

Toll: टोल पासचा सर्वाधिक फायदा पुणे, सोलापूरकर नागरिकांना!
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या बिगर व्यावसायिक वाहनांसाठी ३ हजार रुपयांत फास्टॅग आधारित टोल पास देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, याचा सर्वाधिक फायदा पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील वाहनचालकांना होणार आहे. महाराष्ट्रात केवळ राष्ट्रीय महामार्गावरील ८७ टोल नाके असून, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत सर्वाधिक टोल नाके आहेत. त्यामुळे या पासचा या जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील राज्यातील सर्वाधिक १० टोलनाके असून, सोलापूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर नऊ टोलनाके आहेत. हेच प्रमाण नागपूरमध्ये ६, धाराशिवमध्ये ६, धुळे ५, बीड ४, जळगाव ४, बुलढाणा ३ अशी आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सर्वांत कमी टोलनाके हे सांगली, पालघर, नांदेड, लातूर, कोल्हापूर, हिंगोली आणि अकोला जिल्ह्यांत आहेत. येथे प्रत्येकी एक टोलनाका आहे.
कोणत्या राज्यात सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग टोलनाके?
देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर तब्बल १०५७ टोलनाके असून, सर्वाधिक १४३ टोलनाके हे राजस्थानमध्ये आहेत. त्यानंतर उत्तरमध्ये १२४, मध्ये प्रदेशमध्ये ९८ आणि त्यानंतर महाराष्ट्रात ८७ टोलनाके आहेत. आंध्र प्रदेशमध्ये ७९, तामिळनाडूमध्ये ७३, कर्नाटकमध्ये ६८, गुजरातमध्ये ५९, हरयाणामध्ये ५७, पंजाबमध्ये ३७, बिहारमध्ये ३४, पश्चिम बंगालमध्ये ३१, ओडिशामध्ये ३०, तेलंगणामध्ये २८, छत्तीसगडमध्ये २६, झारखंडमध्ये १८, आसाममध्ये १३, उत्तराखंडमध्ये १२, दिल्लीत ११, केरळमध्ये ११, जम्मू आणि काश्मीरमध्ये ८, हिमाचल प्रदेशमध्ये ५, मेघालयमध्ये ४. चंडीगडमध्ये राष्ट्रीय महामार्गावर १ टोलनाका आहे.
कोणी किती दिला टोल?
२०२०-२१ ते २०२४-२५ (फेब्रुवारीपर्यंत) या मागील पाच वर्षांत संपूर्ण देशात २,२०,५९० कोटींचा टोल वसूल झाला. यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातून २७,०१४ कोटी, राजस्थानमधून २४२०९ कोटी, महाराष्ट्रातून २११०५ कोटी व गुजरातमधून २०६०७ कोटींची टोल वसुली झाली.
राज्यात सर्वाधिक टोल कुठे लागतो ?
राज्यातील एकाच राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर सर्वाधिक २३५ रुपये टोल आकारला जातो. यानंतर २ टोलनाक्यावर १६५, १४०, १३० रुपये टोल आहे. ४ नाक्यांवर १२५ टोल लागतो. ७ नाक्यांवर ११०, ७ नाक्यांवर ६५, ४ नाक्यांवर ४५, एका नाक्यावर ४०, दोन नाक्यांवर ३५, ४ नाक्यांवर १०, एका नाक्यावर आठ रुपये तर दोन नाक्यांवर ०५ रुपये टोल आकारण्यात येतो.सर्वाधिक टोल नाके ११० आणि ६५ रुपये दर आकारतात. अनेक टोल नाके हे ७५, ७०, १२५ रुपये टोल आकारतात.