मोबाईलवर कलचाचणीला घेण्यास अडचणी : मुख्याध्यापक संघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 12:06 IST2018-12-24T11:55:18+5:302018-12-24T12:06:52+5:30
शाळांनी मोबाईल अॅपवर १८ डिसेंबर २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत कलचाचणी घ्यावी,अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.

मोबाईलवर कलचाचणीला घेण्यास अडचणी : मुख्याध्यापक संघ
पुणे : राज्यातील ग्रामीण व दूर्गम भागातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘अॅनरॉईड’ मोबाईल उपलब्ध होत नाही. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी केवळ ‘ मोबाईल अॅप’वरच न घेता; संगणकावरही घेण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी मुख्याध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी मोबाईल अॅपवर घेतली जात आहे.शाळांनी मोबाईल अॅपवर १८ डिसेंबर २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत कलचाचणी घ्यावी,अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील व ग्रामीण भागातील शाळांनी कलचाचणी घेण्यास सुरूवात केली आहे.त्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसात राज्यातील ४ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यात कलचाचणी घेण्यास अडचणी येत असल्याची तक्रार मुख्याध्यापक संघातर्फे राज्य मंडळाकडे करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड म्हणाले, पालघर ,ठाणे यासारख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईलला इंटरनेट कनेक्ट होण्यास अडचणी येत आहेत. तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पुरेसे ‘अॅनरॉईड’मोबाईल उपलब्ध होत नाहीत. एका मुलाची कलचाचणी घेण्यासाठी दोन-दोन तास जात आहेत. विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा दोन महिन्यांवर आली आहे. मात्र,विद्यार्थी व शिक्षकांचा वेळ ‘मोबाईल अॅप’वर परीक्षा देण्यात जात आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाने संगणकवरही कलचाचणी घेण्यास परवानगी द्यावी,याबाबत राज्य मंडळाच्या अध्यक्षांबरोबर चर्चा केली आहे.परंतु,अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.परंतु,मागील वर्षाप्रमाणे यंदाही संगणकावर कलचाचणी घेण्यास परवानगी द्यावी.
-----------------------
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी आत्तापर्यंत १७ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.त्यातील ४ लाख विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात आली आहे.सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल अॅपवर कलचाचणी घेण्यात आली.त्यावेळी कोणतीही अडचण आली नाही.तसेच सध्या विद्यार्थी मोबाईल अॅपवर कलचाचणी देण्याचा आनंद घेत आहेत.ज्या विद्यार्थ्यांना मोबाईल अॅपवर चाचणी देता येणार नाही, त्यांच्याबाबत कोणता निर्णय घ्यावा,हे नंतर ठरविले जाईल.
- शकुंतला काळे,अध्यक्ष,राज्य मंडळ
----------------
पुणे जिल्ह्यातील शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात अडचणी येत असल्याची तक्रार सध्या तरी मुख्याध्यापक संघाकडे प्राप्त झालेली नाही.मोबाईलवर कलचाचणी घेणे अवघड जात असल्याचे दिसून आल्यास याबाबत राज्य मंडळाकडे पाठपुरावा केला जाईल.
- हरिश्चंद्र गायकवाड,अध्यक्ष ,मुख्याध्यापक संघ,पुणे