“सावरकरांना भारतरत्न दिला जावा असे मानत नाही”; प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, RSSवरही टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 16:07 IST2026-02-09T16:07:05+5:302026-02-09T16:07:50+5:30
Prakash Ambedkar Reaction On Veer Savarkar Bharat Ratna: सावरकरांवरील माझा लेख हा मोहन भागवत यांनी वाचलेला नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

“सावरकरांना भारतरत्न दिला जावा असे मानत नाही”; प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान, RSSवरही टीका
Prakash Ambedkar Reaction On Veer Savarkar Bharat Ratna: स्वातंत्र्यवीर सावरकर कोट्यवधी हृदयाचे सम्राट आहेत. त्या समितीत मी नाही, जर कोणी त्या समितीमधील मला भेटले तर त्यांना मी नक्की विचारेन, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी सदर प्रतिक्रिया दिली. यावर आता वंचिन बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य करताना संघावर टीका केली.
पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, दुर्दैवाने असे म्हणेन की, सावरकरांवरील माझा लेख हा मोहन भागवत यांनी वाचलेला नाही. सावरकरांच्या दोन भूमिका आहेत, एक क्रांतिकारक सावरकर आणि एक ब्रिटिशांना मदत करणारे सावरकर, त्यामुळे अशा व्यक्तीला, ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली आणि पत्री सरकार जे शेवटपर्यंत महाराष्ट्रात लढत होते, त्या सरकारमधील लोकांना पकडून देण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते हिंदू महासभेने केले आहे. हे आम्ही आमच्या प्रमुखांच्या सांगण्यावरून करतो, असे विधान समोर आले होते, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
अशा व्यक्तीला भारतरत्न दिला जावा असे मी मानत नाही
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, मी असे म्हणेन की, अटक होण्यापूर्वी सावरकर हे क्रांतिवीर होते. हे सगळ्यांनी मान्य केले पाहिजे. परंतु, जेलमधून सुटल्यावर सावरकरांची जी संघटना होती, त्यांनी पत्री सरकारमधील लोकांना पकडून देण्याचे काम केले. सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये असे उदाहरण आपल्याला आजही पहायला मिळतात. पत्री सरकारमधील लढावय्यांच्या कुटुंबाला पकडून देणारे सावरकर समर्थक होते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला भारतरत्न दिला जावा असे मी मानत नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्र भक्ती किती ढोंग आणि पाखंड आहे. जावेद अख्तर यांना आमंत्रण दिल्याचे मला दिसत नाही. ते थोर सामाजिक विचारवंत आहे. जावेद अख्तर यांचे काका हे अंदमानमध्ये सावरकरांसोबत काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. हे बहुतेक त्यांना माहिती नसेल. शाहरूख खानला बोलवले नाही. शाहरूख खानचे आजोबा हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्यातील सेनापती होते. त्यांच्या दृष्टीने हे सगळे राष्ट्रद्रोही असावेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली.