मुंबई : मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावरील छोट्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी २४ तास विशेष दुरुस्ती पथक तैनात केले आहे. हे पथक रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करीत आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी बुधवारी सांगितले.
समृद्धी महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर एमएसआरडीसीने हा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा ७६ किमीचा मार्ग ५ जूनपासून प्रवाशांसाठी खुला झाला. त्यावर १९ दिवसांतच शहापूरजवळ खड्डे पडले. त्यामुळे एमएसआरडीसीवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर एमएसआरडीसीने तत्काळ हे खड्डे बुजविले.
मुसळधार पावसामुळे ७ ठिकाणी डांबरी पृष्ठभाग निघून खड्डे पडले होते. या सर्व खड्ड्यांचे एकूण क्षेत्रफळ साधारण १ चौ. मी. एवढे होते, असे गायकवाड यांनी सांगितले. मात्र भुयारी मार्गाच्या पुलाला कोणतीही क्षती झालेली नाही. या पुलाच्या स्लॅबचे काँक्रीट आणि बांधकाम सुस्थितीत आहे, असेही अनिलकुमार गायकवाड म्हणाले.
देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
समृद्धी महामार्ग आयआरसी मानकाप्रमाणे बांधण्यात आलेला आहे. त्याचा दोषदायित्व कालावधी ४ वर्षे आहे. या कालावधीत महामार्गाची देखभाल दुरुस्ती संबंधित कंत्राटदारांमार्फत नियमित केली जात आहे, असे एमएसआरडीसीच्या अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.