“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 10:34 IST2025-06-08T10:32:28+5:302025-06-08T10:34:34+5:30
Nilesh Rane And Nitesh Rane News: आपण बोलताना सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले पाहिजे, असे सांगत निलेश राणे यांनी बंधू नितेश राणे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पण कारण काय?

“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
Nilesh Rane And Nitesh Rane News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आक्रमक होताना दिसत आहेत. एकीकडे स्थानिक पातळीवर जय्यत तयारीला सुरुवात झाली असून, दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. यातच विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटात सामील झालेल्या निलेश राणे यांनी आपले बंधू भाजपा नेते आणि मंत्री निलेश राणे यांना एक सल्ला दिला आहे.
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसला आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत, असे विधान नितेश राणे यांनी केले होते. नितेश राणे आक्रमक शैलीमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. परंतु, आता शिवसेना शिंदे गटात असलेले बंधू निलेश राणे यांनी एक्सवर एक पोस्ट करत सूचक सल्ला दिला आहे.
आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये
नितेश ने जपून बोलावे... मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले पाहिजे. सभेत बोलणे सोपे आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमका कोणाचा फायदा करतोय याचे भान असले पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना गर्भित इशारा दिला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असले तरी धाराशिवच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाहीत. म्हणूनच, जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती दिल्याचे राणे म्हणाले होते. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भाजप आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेना नेते पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
नितेश ने जपून बोलावे... मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2025
सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे.
आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.