“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 19:43 IST2024-06-14T19:43:11+5:302024-06-14T19:43:44+5:30
Jayant Patil News: मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
Jayant Patil News:मराठा आरक्षणासंदर्भातील ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले. महिनाभरात मागण्या मान्य न झाल्यास उपोषण न करता विधानसभा निवडणुकीत उतरून तुमचे उमेदवार पाडू, असा इशाराही जरांगे यांनी दिला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी शब्द दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला चितपट केल्यानंतर महाविकास आघाडीची ताकद आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे घटक पक्षांकडून सांगितले जात आहे. पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. सरकारला मुदतवाढ दिली असली तरी, मनोज जरांगे यांनी आंदोलन सोडणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच शाहगड येथे कार्यालय सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करणार असल्याची गॅरंटी जयंत पाटील यांनी दिली आहे.
आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का? त्यांची मागणी प्रथम पाहावी. आमचे सरकार आले तर त्यांची मराठा आरक्षणाची मागणी पाहिली करून घेऊ, असा शब्द जयंत पाटील यांनी दिला. तसेच दोन आठवड्याचा अधिवेशन करण्याची डाव दिसत आहे. भाषण सुरुवात आणि नंतर दोन दिवस आर्थिक बजेट मांडवे, असे आहे. अधिकचा आठवडा वाढावा ही विनंती आहे. अधिकाचे दिवस वाढवावे. न्याय मागण्यासाठी दिवस मिळावे. शेवटचे अधिवेशन आहे, त्यामुळे सगळ्यांना बोलण्याची संधी मिळावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. ते एबीपी माझाशी बोलत होते.
दरम्यान, अण्णा हजारे बराच वेळ शांत होते. गेली अनेक वर्षे त्यांचे मौन होते. आता बोलत आहेत, हे आश्चर्य आहे. ते आता अजित पवार यांच्यावर का बोलतात? ते त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधावे. त्या आरोपमध्ये आतापर्यंत काही मिळाले नाही. त्यांचा बोलावता धनी नक्की कोण? अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली.