Jayant Patil : "सरकार शेतकऱ्यांना मदत करतंय मात्र कागदावरच"; जयंत पाटलांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 18:26 IST2022-08-18T18:18:00+5:302022-08-18T18:26:15+5:30
Jayant Patil : सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, खाते वाटून घेण्यात हे व्यस्त आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडे, सामान्य जनतेकडे यांचे दुर्लक्ष आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

Jayant Patil : "सरकार शेतकऱ्यांना मदत करतंय मात्र कागदावरच"; जयंत पाटलांचा खोचक टोला
मुंबई - अतिवृष्टीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा दिलासा द्या, सरकार म्हणतंय मदत करतो मात्र मदत अद्याप कागदावरच आहे. सरकारचे बोलणेच जास्त आणि कामात शून्य आहे असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.
सरकार स्थिर करण्यात, नाराजांची मनधरणी करण्यात, खाते वाटून घेण्यात हे व्यस्त आहेत त्यामुळे शेतकऱ्यांकडे, सामान्य जनतेकडे यांचे दुर्लक्ष आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.
मूळ प्रश्नाकडे बगल देण्यासाठी सिंचन चौकशीच्या वावड्या उठवल्या जात आहेत. १५ वर्षे जुन्या गोष्टी उकरून काढून विरोधकांना बदनाम करण्याची ही चाल आहे. सध्याच्या सरकारचे ते कामच आहे मात्र आम्ही काही घाबरत नाही, आम्ही विरोधक म्हणून आपली जबाबदारी पार पाडू असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
"झाडी, डोंगार, हाटिल ओक्के असतील, पण शेती अन् शेतकरी ओक्केमध्ये नाहीत"
झाडी, डोंगार, हाटिल ओक्के असतील, पण आज राज्यातील शेती अन् शेतकरी ओक्केमध्ये नाहीत, या शब्दांत महाराष्ट्राच्या सत्तांतर नाट्यावर चिमटा घेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्तांना सरसकट भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी विधानसभेत केली. नियम २९३ अन्वये विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते.
चव्हाण म्हणाले की, यंदाची अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या पुराने शेती व पायाभूत सुविधांचे प्रचंड नुकसान झाले. शेतीच्या हानीचे योग्य पंचनामे झालेले नाहीत. प्रशासनाने केवळ नदी व नाल्यांच्या काठावरील पूरग्रस्त शेतीचेच पंचनामे केले की काय, अशी शंका आहे. प्रत्यक्षात पिकांचे नुकसान सरकारी आकडेवारीपेक्षा जास्त आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी १३ हजार ६०० रूपयांची मदत पुरेशी नाही. एवढ्या रक्कमेतून शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीसाठी केलेला खर्चही भरून निघत नाही.